■ सुहास खंडागळे
नुकताच दिव्यातील विकासकामांच्या लोकार्पण व भूमीपूजनाचा कार्यक्रम तुम्ही महापालिकेमार्फत आयोजित केलात आणि त्याच्या आदल्या दिवशी लोकार्पण होणारी जलवाहिनी लिकेज आहे हे तुमच्या प्रशासनाच्या ध्यानात आलं…
नवीन पाईपलाईनचा तो लिकेज काढण्यासाठी त्याच दिवशी तुमच्या प्रशासनाने लोकार्पण होणारा मुख्य रस्ताही खोदला… राज्याचे मुख्यमंत्री या दोन्ही कामांचे लोकार्पण करणार आहेत हे माहीत असतानाही असा ढिसाळपणा करणाऱ्यांवर काय कारवाई झाली?हा प्रश्न आहे.
तुम्ही ज्या महापालिका प्रशासनाचे नेतृत्व करत आहात त्याचे दिव्यातील अस्तित्व हे नावासाठी आहे का असा प्रश्न आम्हाला पडतो. लोकांच्या समस्या आणि सुविधा याची जाण नसलेले प्रशासन दिव्यात पाठवले जाते का अशी शंका आम्हाला येते.जी पाईपलाईन लोकार्पण होण्याच्या आदल्या दिवशी लिकेज आहे हे समजलं आणि जो रस्ता लोकार्पण होण्याच्या आदल्या दिवशी खोदला गेला…तोच प्रश्न लोकार्पण झाल्यानंतर पुन्हा निर्माण झाला.हा ढिसाळ कारभाराचा नमुना आहे.
ज्या नव्या पाईपलाईनचे आपण लोकार्पण करता त्या पाईपलाईनला तुमचे अधिकारी व्हॉल्वचे झाकण लावायला विसरतात?त्यासाठी पुन्हा नवा रस्ता खोदतात… नक्की कोणत्या महाविद्यालयात पदवी घेतलेले अभियंते ठाणे महापालिकेने दिव्याला दिले आहेत?
एखाद्याच ऑपरेशन केल्यानंतर आतील चिरफाड तशीच ठेऊन फक्त बाहेरून टाके घालण्या सारखा हा प्रकार आहे.महापालिकेचे प्रमुख म्हणून आपण हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा. दिव्यात काही केलं तरी चालत ही तुमच्या प्रशासनाची मानसिकता मोडून काढायला हवी.दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.ही कारवाई होणार नाही हे माहीत असताना आम्ही हे लिहीत आहोत,कारण तुमच्या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका गेली अनेक वर्षे दिव्यातील जनतेला बसत आहे.
ज्या रस्त्याचे आणि नव्या जलवाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते होते,त्याबाबत तुमचे अधिकारी गंभीर नसतील तर दिव्यातील इतर कामांच्या दर्जाची स्थिती काय असेल?
काँक्रीट रोड करताना त्याखालील पाईपलाईन, भूमिगत गटारे,किंवा अन्य सुविधा लाईन टाकण्यासाठी संबंधित विभागांचा समन्वय असायला हवा.दिव्यात तो नाही हे स्पष्ट झालं आहे.तुम्ही काय कारवाई करणार हा येथील जनतेचा प्रश्न आहे.
गणेश नगर येथे नव्या काँक्रीट रोड खालील नव्या जलवाहिनीला व्हॉल्वचे झाकण लावायला महापालिका प्रशासनाचे लोकं विसरणे हा गमतीचा विषय नसून स्वतःला स्मार्ट सिटी म्हणवू पाहणाऱ्या ठाणे महापालिकेच्या ढिसाळ कारभाराची पोलखोल आहे.
ठाणे महापालिकेचे अधिकारी दिव्याबाबत किती गंभीर असतात,किती आत्मीयता त्यांच्याकडे दिव्याबाबत आहे याचं उदाहरण वरील घटना आहे…राज्याचे प्रमुख ज्या विकासकामांचे उदघाटन करणार ते तरी नीटनेटके करावे याबद्दलची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांकडे नाही असे प्रशासन दिव्यातून माघारी बोलावणार का?हा आमचा प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपणास प्रश्न आहे.