Homeशहर परिसरइतक्या वर्षात दिव्यातील वर्दळीच्या रस्त्यांना ना फेरीवाला क्षेत्र घोषीत नाही हे दुर्दैव...

इतक्या वर्षात दिव्यातील वर्दळीच्या रस्त्यांना ना फेरीवाला क्षेत्र घोषीत नाही हे दुर्दैव -विजय भोईर

■ दिवा न्यूज विशेष

दिवा:-दिवा शहर वाढत आहे.शहराची लोकसंख्या वाढत आहे. शहरात असणाऱ्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांना अद्यापही ना फेरीवाले क्षेत्र किंवा फेरीवाला क्षेत्र महापालिकेमार्फत जाहीर न झाल्याने कशाही पद्धतीने फेरीवाले बसतात आणि त्यातून अनागोंदी निर्माण होते.खरंतर महापालिकेने फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्र ही स्वतंत्रपणे घोषित करायला हवीत,जेणेकरून नागरिकांनाही दिलासा मिळेल आणि फेरीवाल्यांनाही त्यांचा व्यवसाय करता येईल,मात्र ठाणे महापालिकेने इतक्या वर्षात याकडे दुर्लक्ष केलं ही दुर्दैवाची गोष्ट आहे,असे जागा हो दिवेकरचे अध्यक्ष विजय भोईर यांनी म्हटले आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर हल्ला झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच दिव्यात घडली. दिव्यात फेरीवाल्यांबाबत महापालिकेचे धोरण हे या आधीच स्पष्ट असले असते तर अशा घटना टळल्या गेल्या असत्या असे विजय भोईर यांनी म्हटले आहे. ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने दिवा शहरातील वर्दळीच्या रस्त्यांना ना फेरीवाला क्षेत्र घोषित करणे गरजेचे असतानाही अद्याप शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते हे ना फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्या ठिकाणच्या जागा मोकळ्या करण व रस्ते नागरिकांसाठी खुले करणं हे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य असताना त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्याचबरोबर दिवा शहरात फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यासही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. ठाणे व अन्य शहराच्या धर्तीवर दिवा शहरातही महापालिकेने फेरीवाला क्षेत्र व ना फेरीवाला क्षेत्र हे जाहीर करणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकाना रस्त्याने चालताना त्रास होणार नाही व फेरीवाल्यांना देखील त्यांचा व्यवसाय करता येईल याकडे विजय भोईर यांनी लक्ष वेधले आहे. मागील अनेक वर्ष ठाणे महापालिकेत दिवा शहर असतानाही दिव्यातील मूलभूत सुविधांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत राहिले आहे. फेरीवाला क्षेत्र व ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यासाठीची मोहीम येथील रस्त्यांचे सर्वेक्षण करून महापालिकेने हाती घ्यावी अशा पद्धतीची मागणीच आता विजय भोईर यांनी केली आहे.दिवा शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच वर्दळीच्या रस्त्यांचा अभ्यास करून महापालिकेने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे आवाहन विजय भोईर यांनी केले आहे. शहराच्या नियोजनासाठी महापालिकेच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेऊन दिवा शहरात शिस्तबद्ध मांडणी करणे गरजेचे आहे.आधीच दिव्यातील रस्ते हे निमुळते आहेत. येथे रस्ता रुंदीकरणाचा मोठा प्रश्न आहे.रस्ते लहान असल्याने व अनेक रस्त्यांना फुटपाथ नसल्याने नागरिकांना चालणेही अवघड होते. नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन व फेरीवाल्यांचा व्यवसाय लक्षात घेऊन दिवा शहरात ना फेरीवाला क्षेत्र व फेरीवाला क्षेत्र घोषित होणे आवश्यक असल्याचे विजय भोईर यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!