दिवा:-बेडेकर नगर येथे राहणारा जितेश उत्तेकर हा तरुण आपला टेम्पो नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर काढत असताना त्याच्या टेम्पोचा फेरीवाल्याच्या छत्रीला धक्का लागला. ज्यामुळे फेरीवाल्याचे आणि या तरुणाचे भांडण झाले. यावेळी येथील फेरीवाल्यांच्या कुटुंबातील तीन पुरुष आणि एक महिला सदस्याने आपल्या जवळच्या चाकूने या तरुणाच्या अंगावर धावून जात त्यास मारहाण केली. यात हा तरुण जखमी झाला. हा सर्व प्रकार तिथल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याबाबत दिवा मनसेने आवाज उठवत सदर फेरीवाल्यावर कारवाईची मागणी केली आहे.
या सर्व प्रकारची माहिती मिळताच दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवा पोलिस चौकीत धाव घेत त्या फेरीवाल्याच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. दिव्यात फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला असून ठाणे महानगरपालिका याकडे डोळेझाक करत असल्याने फेरीवाले माजलले आहेत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. फेरीवाल्यांना पाठीशी घालणारे दिवा शहर बकाल करत असल्याचाही आरोप मनसेने केला आहे.नागरिकांवर चाकूने हल्ला करण्यापर्यंत यांची मजल गेली असून त्यांना प्रशासनाची कोणातीच भीती उरलेली नाही. यावर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई न केल्यास मनसे रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांच्या विरोधात जनआंदोलन करेल असे मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे यांनी स्पष्ट केले आहे.या घटनेबाबत दिवा मनसेचे प्रशांत गावडे यांनी व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली आहे.