दिवा:- दिव्यात मे महिन्यापासून सुरू असणारा विजेचा लपंडाव अद्याप सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून दिव्यात टोरंट कंपनीकडून केला जाणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहरातील नागरिकांत कंपनी प्रशासनाविरोधात संतापाची भावना पहायला मिळत आहे.
दिवा शहरातील मुंब्रा देवी कॉलनीसह विविध भागात दररोज वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.काही भागात व्होल्टेज समस्या निर्माण झाल्याने नागरिकांची विद्युत उपकरणे धोक्यात येण्याची शक्यता नागरिक बोलून दाखवतात. दिवा शहरातील अनेक भाग हे दिवसातील आठ आठ तास वीज पुरावठ्या पासून वंचित राहतात.नागरिकांनी तक्रार करूनही वीजपुरवठा वेळेत सुरू होत नाही.टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा असे नागरिकांना सांगितले जाते मात्र बहुसंख्य भागाचा वीज पुरवठा खंडित होत असतानाही स्वतःहून वेळेत वीज पुरवठा सुरळीत करण्याची यंत्रणा कंपनीकडे नाही का?असा सवाल नागरिक विचारत आहेत. एकीकडे दिव्यातील जनतेला वीजबिल भरमसाठ येत असताना दुसरीकडे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरावठ्या मुळे शहरातील नागरिकांत टोरंट कंपनी प्रशासन विरोधात संतापाची भावना वाढत आहे.






