पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मत, ओवळा-माजिवडा मतदारसंघात संयुक्त मोर्चा संमेलन
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वााखाली २०१४ मध्ये भाजपाची सत्ता आल्यामुळेच भारताची आर्थिक स्थिती मजबूत झाली. अन्यथा, भारताची स्थिती श्रीलंका, बांगलादेशप्रमाणे झाली असती, असे मत राज्याचे कौशल्य विकास व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
मोदी@९ अंतर्गत भाजपातर्फे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या संयुक्त मोर्चा संमेलनात लोढा बोलत होते. या वेळी आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, ओवळा-माजिवडा निवडणूक प्रमुख मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, अर्चना मणेरा, स्नेहा आंब्रे,
आदींसह मंडल अध्यक्ष व विविध मोर्चांच्या संयोजनकांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रप्रेम व अध्यात्म प्रेमाने भारलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्याग, तपस्या आणि राष्ट्राबद्दल आस्था असल्याच्या भावनेतून नऊ वर्षांत समर्थ भारत घडविला. जगातील अव्वल पाच राष्ट्रांमध्ये भारताची अर्थव्यवस्था पोचविली. मजबूत अर्थव्यवस्थेमुळेच भारताची आर्थिक स्थिती श्रीलंका व बांगलादेशप्रमाणे झाली नाही, असे मत मंत्री लोढा यांनी व्यक्त केले.