प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव’ पुरस्काराने लेखक, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार सन्मानित
पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या संगीतमय संवादाला ठाणेकरांची दाद
ठाणे :- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एंटरटेन्मेंट यांच्या वतीने आयोजित साहित्यवलय पुरस्कार वितरण सोहळा पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सुरांच्या मैफिलीत संपन्न झाला. प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्काराने यावेळी लेखक, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचा सन्मान करण्यात आला.
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा ‘साहित्यवलय पुरस्कार २०२५’ सोहळा शुक्रवारी गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मनसे नेते अभिजित पानसे, दिग्दर्शक, कवी विजू माने, अभिनेते सुयश टिळक, रवींद्र मोरे, आयोजक मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे व साहित्यविश्वातील मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर होत्या.
यावर्षीपासून दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार लेखक, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना रोख रक्कम, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
सोहळ्याच्या पूर्वार्धात पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचे गायन आणि त्यांचा शिष्य कवी, संगीतकार ऋग्वेद देशपांडे यांनी साहित्यिक संवाद साधला. सोहळ्याचे सूत्रसंचालन मानसशास्त्रज्ञ पूजा देशपांडे यांनी केले.
यावर्षी ‘सारंगीचे सूर’ या काव्यसंग्रहासाठी दीपक मच्याडो (बोरीवली) यांना साहित्य पदार्पणासाठी सन्मानित केले. सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून ‘सवाष्ण’ या पुस्तकासाठी डॉ. क्षमा गोवर्धने शेलार (जुन्नर), सर्वोत्कृष्ट स्त्रीवादी साहित्य विभागात विद्या पोळ जगताप (सातारा) यांना ‘बाय गं’ या साहित्यकृतीसाठी, कथासंग्रहासाठी ‘वर्जीतमध्य’ या कथासंग्रहाचे लेखक सुरेंद्र दरेकर (पुणे), ललित लेखनासाठी ‘सरतं काही सोडू नये’ या लेखनासाठी सुनील यावलीकर (अमरावती), अनुवादित साहित्य ‘देवाची स्वाक्षरी’ ए आर नायर आणि जे ए थेरगावकर (कल्याण-डोंबिवली), वृत्तबद्ध काव्यसंग्रह ‘रंध्रात भीनावा छंद’ यासाठी कांचन सावंत (तळेगाव), कवितासंग्रह ‘जामिनावर सुटलेला काळा घोडा’ या लेखनासाठी धनाजी धोंडीराम घोरपडे (सांगली) यांना, गजल संग्रह या विभागात ‘निव्वळ योगायोग’ या गजलसंग्रहासाठी प्राजक्ता पटवर्धन (पुणे), बालसाहित्य मध्ये ‘थेंबा थेंबाची कहाणी’ या साहित्यासाठी गणेश शिवराम भाकरे (नागपूर), ऐतिहासिक साहित्य ‘पाकिस्तान का मतलब क्या’ यासाठी श्रीधर लोणी (पुणे) यांना सन्मानित करण्यात आले. दरम्यान यावर्षी ‘लक्षवेधी साहित्य पुरस्कार’ अंतर्गत सात साहित्यिकांची निवड झाली. यामध्ये कल्पना बांदेकर (सावंतवाडी), मृणालिनी चितळे (पुणे), सागर जाधव जोपुळकर (नाशिक), आदित्य अंकुश संतोषी (ठाणे), डॉ. सुमन नवलकर(वडाळा), रामदास खरे (ठाणे) आणि प्रदीप कुलकर्णी (मुलुंड) यांनाही सन्मानित करण्यात आले.






