आंतरराष्ट्रीय पर्यावरण संशोधक कु. प्राची शेवगावकर यांचा कानमंत्र..
ठाणे: भारतातील प्रत्येक घर, प्रत्येक उद्योग कार्बन न्युट्रल व्हावा. हे आपले ध्येय आहे. तेव्हा, हवामान बदलासाठी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे पर्यावरणपुरक बदल घडवुन इतरांनाही या कृतीबद्दल सांगा. त्यामुळे आणखी १० जण प्रभावित होऊन खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात होईल. असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय युवा पर्यावरण संशोधक कु. प्राची शेवगावकर हिने दिला आहे.
ठाण्यात आयोजित ३९ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुरुवारी गुंफताना २६ वर्षीय कु. प्राची हिने “हवामान बदल : जबाबदारीतून संधीकडे” या विषयावर ठाणेकरांशी संवाद साधला. या प्रसंगी, व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष कोकण पदवीधर मतदार संघाचे आ. निरंजन डावखरे, माधुरी ताम्हाणे उपस्थित होत्या. तर, श्रोत्यांमध्ये व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ. संजय केळकर, माजी नगरसेवक सुरेश कांबळे, दीपक जाधव, शरद पुरोहित, माजी उपमहापौर सुभाष काळे, टीजेएसबीचे शरद गांगल, विद्याधर वैशंपायन, आशाताई कुलकर्णी, निलिमा डावखरे आदीसह शेकडो नागरीक उपस्थित होते.
हवामान बदल ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीचे तापमान १ डिग्री सेल्सीयसने वाढत असुन, यात सातत्याने वाढ होत आहे. प्रामुख्याने वातावरणातील हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमानात वाढ होत आहे. याचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी, कचरा वेचक, स्वच्छता कर्मचारी आणि वस्त्या वस्त्यांमधील लहान मुलांशी संवाद साधत तसेच अनेक संस्था संघटनाच्या भेटी घेतल्याचे स्पष्ट करून प्राची शेवगावकर हिने, हवामान बदलासाठी भारतासह जगभर लोकचळवळीतुन करीत असलेल्या भगिरथ प्रयत्नांची गाथा श्रोत्यांसमोर मांडली. हवामान बदलाचे मानवी जीवनावर परस्परसंबंधित परिणाम होतात. दुष्काळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जगभरात दरवर्षी २० कोटी लोक स्थलांतरीत होतात. अनेकांना अन्न मिळवणे शक्य होत नाही. जंगले नष्ट होतायत, वणवे पेटतायत, दुष्काळ पडतोय या नैसर्गिक तसेच मानवी क्रियाकलापांमुळे होणाऱ्या १५ घसरण बिंदूचा (टीपींग पॉईंट) हवामान बदलामध्ये गांभिर्याने विचार व्हायला हवा. असे नमुद करून प्राचीने दैनंदिन आयुष्यात आपण करीत असलेल्या अनेक गोष्टीमधून स्वतःवर होणारे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मिशन लाईफ या चळवळीच्या माध्यमातुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यावरण बदलासाठी झटत आहेत. याचा उहापोह करीत, प्रत्येक घर आणि प्रत्येक देश कार्बन न्युट्रल व्हावा हे आपले ध्येय आहे. यासाठी स्वतःपासुन सुरुवात करायला हवी. दैनंदिन जीवनात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या कृतीमध्ये काही बाबी वर्ज्य करून किमान १० टक्के कार्बन फुटप्रिंट कमी करेन असा निर्धार करा. जेणेकरून तीन लाख झाडे जेवढे प्रदुषण वाचवतील इतका लाभ या छोट्या छोट्या कृतीमधुन होईल. त्याचबरोबर,सौर सारख्या अन्य अक्षय उर्जेचा वापर करण्याचे प्राची यांनी सुचवले.
हवामान बदलासाठी ॲप
स्वतः प्रदूषण कसे कमी करू शकता, यावरील “कूल द ग्लोब” हे मोफत अँप बनवले असुन १५० हुन अधिक देशांमध्ये ते वापरले जाते. दररोज कोणत्या गोष्टी न केल्यास किती कार्बन उत्सर्जन कमी होईल ते यात सांगितले आहे. त्यात पायी चालणे, सायकलचा अथवा सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. मांसाहार न करणे, झाडं लावणे अशा जीवनशैलीशी निगडीत १०० हुन अधिक गोष्टींचा समावेश या अँपमध्ये असल्याचे कु. प्राची शेवगावकर यांनी सांगितले.
समाजाला दिशा देणारी व्याख्यानमाला
तीन पिढ्या बघितलेली ही व्याख्यानमाला आज ३९ व्या वर्षात पोहचली असुन या व्याख्यानमालेची
ठाणेकरांबरोबर नाळ जुळली आहे. चांगला विचार किंबहुना समाजाला दिशा देण्याचे काम व्याखानमालेतुन होत असल्याचे आ. निरंजन डावखरे यांनी सांगितले.