दिवा:-दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिव्यातील नालेसफाई फोल ठरली आहे. पालिका प्रशासनाचे दावे अवघ्या काही तासाच्या पावसाने चुकीचे ठरवले असून काही ठिकाणी बैठ्या चालींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले.
दिवा शहरात नालेसफाई ही पावसा आधी व्हावी यासाठी येथील सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी पालिका प्रशासनाला वारंवार निवेदन दिली होती.जाणकार नागरिकांनीही याबाबत पालिकेकडे पाठपुरावा केला होता.मात्र दिव्याच्या नालेसफाईकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी दुर्लक्ष झाल्याचे गुरुवारी झालेल्या पावसात स्पष्ट झाले.दिव्यातील अनेक सकल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी सखल भागात बैठ्या चालींमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. काही भागांमध्ये अंतर्गत गटार साफ न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याचे सुद्धा पाहायला मिळाले.यामुळे नागरिकांना चालताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.दिव्यातील नालेसफाई वेळेत व्हावी यासाठी पालिका प्रशासनाकडे येथील नागरिकांनी मागणी करूनही त्यावर वेळेत उपाय योजना न झाल्याने दिव्यातील नागरिकांतून पालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.दिव्यातील मुख्य नाले व अंतर्गत गटार ही अनेक ठिकाणी जोडली न गेल्याने रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रकार घडतात याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे या घटनांमुळे स्पष्ट होत आहे. पावसाच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या पावसाळ्यात प्रचंड पाऊस झाल्यास येथील अनेक भागात पूर सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.