विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन
दिवा:- दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या सद्गुरु नगर, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा स्टेशन रोड आणि अभ्युदय बँकेमागे असलेल्या इमारतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने आणि अधिकृत नळ कनेक्शन असतानाही पाणी येत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे महानगरपालिकेकडे नवीन सब लाईन टाकण्याची मागणी केली आहे. विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी यासंदर्भात सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, या परिसरात अधिकृत नळजोडण्या १०० ते १५० असून त्या नागरिकांना नवीन सब लाईन टाकून त्यांच्या कायमस्वरूपी पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढावा अशी विनंती करण्यात आली आहे.
सहयोग भवन बिल्डिंग, एकविरा अपार्टमेंट, एकविरा दर्शन या परिसरात नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे.या भागातील मुख्य जलवाहिनीचा व्यास ‘१८’ आणि ‘२४’ असून दोन्ही परिसर १०० ते १५० फूट अंतरावर आहेत असे प्रकाश पाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे. या भागातील इमारतींच्या अधिकृत पाण्याच्या लाईन असुनही नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही.नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.दोन्ही परिसरामध्ये सब लाईन टाकून येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा. जर याकडे दुर्लक्ष झाले तर मनसेला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ठाणे महानगरपालिकेची असेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
मनसेचे प्रकाश पाटील यांनी हे निवेदन दिले असून, पाण्याच्या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.