ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे ठाणे शहरातून एकूण ४०० एसटीच्या बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव हा हिंदू लोकांच्या जिव्हाळ्याचा सण असून दरवर्षी गणेशभक्त आवर्जुन आपापल्या गावी जात असतात. गणेशोत्सवासाठी कोकण आणि घाटमाथ्यावर जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेचे आरक्षण सहा महिने अगोदरच झाल्यामुळे तिकिट मिळविणे जिकिरीचे होते. तसेच उत्सवादरम्यान खाजगी बसेसचे भाडे सुद्धा परवडणारे नसते. तसेच अनेकदा एस.टी.चे आरक्षण मिळत नाही यासाठी चाकरमान्यांना दिलासा मिळावा व त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने एस.टी. बसेस सोडण्यात येणार आहे. कोविडच्या कालावधीतही ठाणे शहरातून गणेशोत्सवासाठी प्रवाशांना एस.टी.ची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचेही नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.
ठाणे शहरातून पाली, माणगांव, महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ वेंगुर्ला, वैभववाडी, सावतंवाडी, दोडामार्ग, शिरोडा या मार्गावर तसेच सातारा, कराड, पाटण, कोल्हापूर, गडहिंग्लज या मार्गासाठी देखील बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
कोकणात जाण्यासाठी ठाण्यातून सोडण्यात येणाऱ्या बसेसचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे, जेणेकरुन ठाण्यातून एस.टी. संबंधित गावी पोहचल्यानंतर तेथून चाकरमान्यांना घरी जाणे सहज शक्य होईल अशा दृष्टीने नियोजन केले आहे. २८ व २९ ऑगस्ट २०२२ रोजी या बसेस सोडण्यात येणार आहेत. ४०० बसेसच्या माध्यमातून एकूण २० हजार चाकरमानी या बसमधून कोकणात जाणार आहेत. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली परिसरातील गणेशभक्तांसाठी देखील एस.टीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.