ठाणे: – वागळे इस्टेट परिसरातील हाजुरी दर्गा मागे मौलाना आझाद शाळेजवळ गंगाधर चाळीमधील एका घराची अंदाजे २० फूट लांब व ०५ फूट उंच असलेली भिंत बाजूला असलेल्या दुसऱ्या घरावर कोसळल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव चार घरे रिकामी करून त्या घरामधील २८ रहिवाशांची राहण्याची व्यवस्था जवळ असलेल्या मदरसामध्ये करण्यात आली आहे. सुदैवाने त्या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
हजुरीत गंगाधर चाळ असून त्या चाळीत खालील अन्सारी यांच्या मालकीचे तळ अधिक २ मजली घर आहे. ते बांधकाम अंदाजे ३५ वर्ष जुने असून त्या घराची भिंत बाजूला असलेल्या बाबूलाल विश्वकर्मा यांच्या घरावर पडली. त्यावेळी विश्वकर्मा यांच्या घराचे पत्रे फुटून नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष या विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. तसेच त्यांनी घटनास्थळी पडलेली धोकादायक भिंत बाजूला केली. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव चार घरे रिकामी करून त्या घरामधील २८ रहिवाशांची राहण्याची व्यवस्था जवळ असलेल्या मदरसामध्ये केली आहे. याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव त्या घराच्या चारी बाजूने धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग करण्यात आली असून सदर ठिकाणी पुढील कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग(नौपाडा कोपरी प्रभाग समिती) यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.