Homeठाणे-मेट्रो'टीडीआरएफ' जवानांप्रमाणेच अन्य कर्मचाऱ्यांनाही न्याय द्यावा

‘टीडीआरएफ’ जवानांप्रमाणेच अन्य कर्मचाऱ्यांनाही न्याय द्यावा

भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांची मागणी

ठाणे :- महापालिकेने आपत्ती व्यवस्थापनासाठी नेमलेल्या `टीडीआरएफ’ जवानांप्रमाणेच महापालिकेच्याच आरोग्य, पाणीपुरवठा आणि घनकचरा विभागात वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर सेवेत घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
ठाणे महापालिकेने काही महिन्यांपूर्वी `टीडीआरएफ’ पथकातील ३० जवानांना कायमस्वरुपी सेवेत दाखल करुन घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या जवानांना सुमारे सात वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेच्या सेवेत दाखल करून घेण्यात आले होते. या जवानांप्रमाणेच कोरोनाची महामारी, पूरपरिस्थिती, कडाक्याची थंडी वा असह्य उन्हाळ्यातही महापालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा आणि घनकचरा विभागातील कामगारांकडून कर्तव्य बजाविले जाते. कोरोना आपत्तीच्या काळात मृत्यूची टांगती तलवार असतानाही महापालिकेच्या शेकडो कंत्राटी कामगारांनी जीव धोक्यात घातला होता. शहरात स्वच्छता राखण्याबरोबरच पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी कार्यरत होते. स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेला राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छतेचा पुरस्कार मिळवून देऊन ठाण्याचा झेंडा फडकविला होता. कोरोनाच्या काळात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्करून कोरोनाबाधीत मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले होते. या कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांशी कंत्राटी कर्मचारी आहेत. ते गेल्या २० ते २५ वर्षांपासून ठेकेदाराकडे काम करीत आहेत. आता त्यांना वाढत्या वयामुळे नव्या नोकरीची संधी मिळणार नाही. महापालिकेच्या सेवेत प्रामाणिकपणे काम करूनही त्यांना महापालिकेत अनेक वर्षानंतरही मानधन तत्वावर नोकरीची संधी मिळालेली नाही, हे दुर्देवी आहे. या कर्मचाऱ्यांबाबत मानवता व सहानुभूतीचा दृष्टीकोन ठेवून आरोग्य, पाणीपुरवठा आणि घनकचरा विभागात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर सेवेत सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी गटनेते नारायण पवार यांनी केली आहे.

error: Content is protected !!