ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ (कालावधी 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025) अंतर्गत अमृत गटात 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या गटामध्ये ठाणे महानगरपालिकेस तिसरा क्रमांक प्राप्त झाला. हा पुरस्कार आज ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विधानसभा अध्यक्ष ॲङ राहूल नार्वेकर आदी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.
या पुरस्काराचे वितरण डोम, सरदार वल्लभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे झाले. या पुरस्कार सोहळ्यास ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपआयुक्त मधुकर बोडके, सहाय्यक आयुक्त राजेंद्र सोनवणे, सोनल काळे, राहुल दुर्गुडे, प्रदूषण विभागाच्या वैशाली पालकर, ओम परळकर, भारत बिलसोर आदी उपस्थित होते.
1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत ठाणे महापालिकेने भुमी घटकांतर्गत 81,734 झाडांची लागवड, 99 नवीन हरित क्षेत्रांची निर्मिती, 729 हेरिटेज वृक्षांची नोंद व सर्वेक्षण, तसेच कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी मोहिम प्रभावीपणे राबविली. जैववैद्यकीय, ई-कचरा व C&D कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात संकलन व पुनर्चक्रिकरण करण्यात आले.
वायू घटकांतर्गत हवेच्या गुणवत्तेचे पाच ठिकाणी नियमित निरीक्षण, हरित फटाक्यांबाबत जनजागृती, बांधकामांवरील प्रदूषण नियंत्रण उपाययोजना तसेच Heat Resilience व Flood Action Plan तयार करण्यात आला. जल संवर्धनांतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग, मलजल प्रक्रिया प्रकल्पांची कार्यक्षमता, विहिरींचे पुनरुज्जीवन आणि तलाव संवर्धनासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.
अग्नी घटकांतर्गत एलईडी पथदिवे, ई-बस सेवा, ईव्ही चार्जिंग स्टेशन, सोलार रूफटॉप आणि सोलार वॉटर हिटर यांसारख्या ऊर्जा बचत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.आकाश घटकांतर्गत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ई-प्रतिज्ञा घेतल्या असून शेकडो जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांच्या आधारे ठाणे महानगरपालिकेने पर्यावरण संरक्षणात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला.






