ठाणेकरांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
ठाणे:- ठाणे महानगरपालिकेला मुंबई महानगरपालिकेकडून प्रक्रिया केलेले अतिरिक्त २० द.ल.लि. शुद्ध पाणी प्रतिदिन पाणी उपलब्ध करून द्यावे अशी अनेक वर्षांपासूनची असलेली मागणी शनिवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली. यामुळे ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील कोपरी, आनंदनगर, किसननगर, भटवाडी व दिवा परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, नगरअभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत सोनाग्रा व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी, वागळे इस्टेट विभाग- ११ द.ल.लि. प्रतिदिन, कोपरी आनंद नगर विभाग ६ द.ल.लि. प्रतिदिन, किसननगर २ द.ल.लि. प्रतिदिन, भटवाडी १ द.ल.लि. प्रतिदिन असा एकूण २० एम एलडी अतिरिक्त शुद्ध पाण्याचा व दिवा परिसराला ६.५० द.ल.लि. प्रतिदिन पाणी पुरवठा करणेस मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून असलेली अतिरिक्त पाण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पूर्ण झाली असून वागळे व दिवा परिसरातील पाणी प्रश्न सुटणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आपला मुख्यमंत्री.. आपला अभिमान असल्याचे सांगत गेल्या अनेक वर्षाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मंजूर झाली असल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, नगरअभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत सोनाग्रा आदींनी.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ठाणेकरांना अतिरिक्त पाणीपुरवठा मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.