ठाणे : ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला वेळोवेळी पूर आला असून पुराच्या पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा जमा झालेला आहे. पाण्यासोबत आलेला गाळ व कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झाला आहे. तसेच इंदिरानगर संप येथे पाण्याची गळती झाल्याने सदरची गळती काढणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने बुधवार येत्या २४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ असा बारा तासांसाठी शटडाऊन घेण्यात येत असून या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.
त्यामुळे इंदिरानगर पंप हाऊसवरील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर इद्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहील तसेच उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. वरील शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.