दिवा रेल्वे स्थानकातील गर्दी आणि प्रवाशांच्या समस्या समजून घेण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी सकाळी दिव्यातून प्रवास करावा, रेल्वेला प्रश्नांची जाणीव होईल
■ सडेतोड/ सुहास खंडागळे
दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांच्या समस्या रेल्वेला समजून घ्यायच्या असतील तर रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्यांनी सकाळच्या वेळेस दिवा सीएसएमटी प्रवास दिवा स्थानकातून करायला हवा.सकाळी दहाच्या ऑफिसला पोहचण्यासाठी येथील प्रवासी किती ट्रेन सोडतात आणि ज्या ट्रेनने प्रवास करतात त्या ट्रेनने कसा प्रवास करतात याचा अनुभव रेल्वे अधिकाऱ्यांनी घ्यायला हवा.चुकून वेळेत ट्रेन या अधिकाऱ्याला पकडता आली तर आत मधील गर्दीचे वास्तव दर्शन त्याला होईल.समस्या कळतील आणि जनतेला न्याय मिळण्यास मदत होईल.रेल्वे प्रशासन असा अनोखा प्रयोग करेल काय हा प्रश्न आहे.
दिवा लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.एखादा अपघात झाला की त्यादृष्टीने फक्त चर्चा होतात. मात्र दर दिवशी प्रचंड गर्दीतून लोकल प्रवासाच्या नरक यातना भोगणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे दुःख रेल्वे प्रशासनाला दिसत नाही. याबाबत बोलताना दिवा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय भोईर सांगतात, जर तुम्ही घाटकोपर सारख्या रेल्वे स्टेशन वरून होम फलाट नसताना सीएसएमटीच्या दिशेने लोकल सोडता,तर मग जंक्शन असणाऱ्या दिवा रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळेस सीएसएमटी वरून येणारी लोकल दोन मिनिटाच्या काळासाठी सुरू करण्यास हरकत काय?
तर सध्या दिवा रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळेस सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल या त्यांच्या नियमित वेळेने न धावल्याचा फटका देखील प्रवाशांना बसतो आणि कमी कालावधीत फलाट प्रवाशांनी भरून जातो.उशिरा आलेल्याना लोकलमध्ये चढण्यास प्रवाशांची झुंबड उडते. आधीच कल्याणकडून भरून येणाऱ्या लोकांमुळे दिव्यातील रेल्वे प्रवाशांना आत मध्ये जाता येत नाही,असं याबाबत बोलताना रेल्वे प्रवासी किरण जाधव सांगतात.
दिवा रेल्वे जंक्शन येथून फलाट क्रमांक सहा,सात,आठ इथे प्रवाशांना अनेक असुविधा भेडसावतात. या ठिकाणी शौचालयाची सुविधा नाही. शौचालय लोकांच्या सुविधेसाठी निर्माण करणे रेल्वेचे जबाबदारी असतानाही मूलभूत पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष आहे.दिवा स्टेशनच्या मुख्य रोड वरून येणारे प्रवासी यांना कोकणात जाणाऱ्या ट्रेन पकडण्यासाठी स्थानकाकडील पहिल्या पादचारी पुलावरून जाता येत नाही. सकाळच्या वेळेस झुंडशाहीने कर्जत,कसारा, डोंबिवली येथून ग्रुप करून येणारे प्रवासी दिव्यासारख्या रेल्वे स्थानकात त्यांच्या ग्रुपचा व्यक्ती सोडून अन्य प्रवाशांना घुसू देत नाहीत.ही देखील गंभीर समस्या असून यामुळेही अनेक प्रवाशांना दरवाज्यातून आज जाता येत नाही.सकाळच्या गर्दीचा नियोजन करण्याचा प्रयत्न रेल्वे करत नाही असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव प्रशांत गावडे दिव्यातील रेल्वे समस्यांवर बोलताना सांगतात.
एकंदरीत दिवा रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळेस कामासाठी घरातून बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवासाच्या नावाखाली प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे.या भागातून मुंबईच्या दिशेने प्रवासाचा दुसरा सक्षम पर्याय नसल्याने नागरिकांचा गर्दीतून जाण्याचा नाईलाज होतो.मागील पाच वर्षात स्थानक सुधारण्याचा कार्यक्रम रेल्वेने हाती घेतला.रेल्वे स्थानकांची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण यावर भर दिला गेला. मात्र दुसरीकडे रेल्वे प्रवाशांना लोकल सेवा अधिक जलद आणि जादा गाड्या सोडण्यात मात्र रेल्वे प्रशासन अपयशी ठरले.दिवा शहरात मागील काही वर्षात वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेतली, तर या ठिकाणाहून स्वतंत्र सीएसएमटी लोकल सोडणे आवश्यक होते.मात्र अद्याप प्रवाशांची ही मागणी पूर्ण झालेली नाही.
घाटकोपर सारख्या रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळेस सीएसएमटी साठी लोकल सोडल्या जातात. दिव्यातून लोकल सोडण्यासाठी मात्र होम पलाट हवा असं कारण रेल्वे प्रशासन देत. दोन ठिकाणच्या दोन रेल्वे स्थानकातील प्रवाशांसाठी वेगवेगळे नियम रेल्वे प्रशासनाकडून कसे काय लावले जातात?हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. घाटकोपर मध्ये राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा विचार ज्या दृष्टिकोनातून रेल्वे करते,त्याच दृष्टिकोनातून दिवा शहरात राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा विचार का केला जात नाही हाही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. सीएसएमटी वरून येणारी लोकल दिवा शहरातून फलाट क्रमांक दोन वरून उपलब्ध असणाऱ्या वेळेमध्ये सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान सोडली गेल्यास त्याचा लाभ दिवा शहरातील प्रवाशांबरोबरच मुंब्रा,कळवा येथील प्रवाशांना ही होईल. या भागातील प्रचंड गर्दीच विभाजन होईल. मात्र रेल्वे प्रशासनाला प्रश्न सोडवण्याची मानसिकता दिसत नाही हेच यातून दिसते.दिव्यात होम फलाट जागेच्या प्रश्नामुळे रखडला आहे.तो सुटेल आणि मग दिव्यातून लोकल सोडू हा विचार रेल्वे प्रवाशांना न्याय देणारा ठरणार नाही.दुसरीकडे कर्जत कसारावरून येणाऱ्या जलद लोकल दिव्यात थांबतात.मात्र या लोकल आधीच भरलेल्या असतात.परिणामी त्याचा फायदा हा दिव्यातील रेल्वे प्रवाशांना तितकासा होत नाही.दिवा शहरातून लोकल सोडली जात नसल्याने दिव्यातून डोंबिवलीच्या दिशेने जाणारे रिटर्न प्रवासी डोंबिवलीतील प्रवाशांना त्रासदायक ठरतात असं डोंबिवलीतील प्रवाशांचं म्हणणं असतं.यातून रेल्वे प्रवाशांमध्ये वाद होत असल्याचे विजय भोईर सांगतात.रेल्वे प्रशासन दोन स्थानकातील प्रवाशांमध्ये हा वाद निर्माण करते का?हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
लोकांना बसायला जागा मिळत नसल्याने ते रिटर्न प्रवास करून आपल्या कामावर जाण्याचा प्रयत्न करतात.सर्वसामान्य जनता रेल्वेच्या आडमुठ्या धोरणासमोर हदबल आहे.जसा मार्ग मिळेल तसा मार्ग प्रवासी शोधतात.यात रिटर्न प्रवास असतो किंवा मग जीव धोक्यात घालून दरवाजात लटकणे असो.रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र लोकल सुटत असल्याने प्रवाशांचे दुःख त्यांना कळणार नाही.रेल्वेला हे मुद्दे लक्षात येत नाहीत याच आश्चर्य आहे. कळवा, मुंब्रा,दिवा हे शहर सर्वसामान्य नोकरदार वर्गाची शहर आहेत.सकाळच्या वेळेस रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी या ठिकाणी आहेत.प्रवासाची अन्य मुबलक साधन या तिन्ही शहरांना नाहीत,याचा विचार करून रेल्वेने स्वतंत्र लोकल दिव्यातून सोडायला हवी. त्यासाठी होम फलाटचा हट्ट सोडायला हवा. सकाळच्या वेळेस किमान चार लोकल दिवा शहरातून सुटल्यास त्याचा फायदा त्या संपूर्ण भागातील रेल्वेच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी होईल. यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे.ही इच्छाशक्ती रेल्वे दाखवणार नसेल तर दिवा, मुंब्रा कळवा रेल्वे स्थानकातून प्रवाशांचा जीवावर बेतणारा प्रवास होण्यास रेल्वेचे धोरण जबाबदार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.