मान्यता नसलेल्या शाळांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार,संचालकांच्या शिष्टमंडळाने रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली घेतली पालिका आयुक्तांची भेट.
दिवा :- दिवा शहरात अनधिकृत शाळांचा विषय चांगलाच चर्चेला आला असून काही मान्यता प्राप्त शाळा आणि काही राजकीय पक्षांनी अनधिकृत शाळा बंद कराव्यात यासाठी कंबर कसली आहे. नुकतेच एका राजकीय पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होत आसल्यामुळे दिवा शहरातील अशा सर्व शाळा ताबडतोब बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. अशातच काल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली तीस पेक्षा जास्त शाळांच्या संचालकांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी दिवा शहरातील २५ हजार शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य खराब होऊ देणार नाही व मान्यता नसलेल्या शाळांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी जाहीर केले आहे.
दिवा शहरात अनधिकृत इमारतींचा विषय गाजत असताना आता मात्र अनधिकृत शाळांचा विषय चव्हाट्यावर आला आहे. ठाणे महानगर पालिकेने पालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे यामध्ये दिव्यासाहीत ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील ८२ शाळांचा या यादीमध्ये समावेश आहे. एकट्या दिवा शहरातील अनाधिकृत शाळांचा विचार केल्यास या शाळांमध्ये आजघडीला २५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि १२०० शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी काम करत आहेत. मागील दोन वर्षापासून नवीन शाळांच्या मान्यतेची ऑनलाईन प्रक्रिया बंद असल्यामुळे तसेच दिवा शहरात ओसी आणि सीसी घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे मान्यता प्राप्त करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिवा शहराची भौगोलिक परिस्थिती बघता व सी.आर.झेड च्या जाचक अटींचा विचार करता येथे अधिकृत शाळा बांधणं हे तांत्रिक दृष्ट्या तरी शक्य नाही. अशातच दिवा शहरात राहण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा शाळा दिवा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे या शाळा बंद कराव्यात अशी मागणी दिवा शहरातीलच काही मान्यता प्राप्त शाळा संचालकांनी व राजकीय पक्षांनी केली असल्यामुळे दिवा शहरातील २५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागले आहे. यामुळे सर्व पालक वर्गामध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं असून आपल्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान तर होणार नाही ना? या चिंतेने पालक शाळांमध्ये खेटा मारत आहेत. याशिवाय दिव्यातील मान्यता प्राप्त शाळांमधील फी परवडत नसल्यामुळे व घरापासून जवळचे अंतर यामुळे पालकांना आपल्या पाल्यांचे शिक्षण अशा शाळांमध्ये करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मुलांना शिकवायचे कसे? या विचारात सर्व पालक वर्ग आहेत. दिवा शहरातील सर्व अनधिकृत शाळांच्या संचालकांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सुद्धा यापूर्वी दिले होतं. त्यामुळे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार काल 30 पेक्षा जास्त शाळांच्या संचालकांनी शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली, सदर भेटीत सर्व अनाधिकृत शाळांनी मान्यता मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असल्याचे शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी सांगितले. दिवावसीयांच्या कठीण काळात शिवसेना ही कायम दिवावासियांच्या सोबत राहिली असून दिवा शहरातील २५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य खराब होऊ देणार नाही व मान्यता नसलेल्या शाळांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असल्याचे देखील रमाकांत मढवी यांनी सांगितले. सर्व शाळांना घेऊन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांची देखील भेट घेणार असल्याचे रमाकांत मढवी यांनी सांगितले आहे. शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी हे पहिल्या दिवसापासून आमच्या सर्व शाळांच्या पाठीशी उभे आहेत, काल रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर आमची सकारात्मक बैठक झाली. संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आमच्या पाठीशी असल्यामुळे आमची आणि सर्व पालकवर्गाची चिंता कमी झाली असल्याचे मत भारत इंग्लिश स्कूलचे रवी गायकवाड यांनी व्यक्त केलं.