दिवा:- ठाणे शहरातील दिवा विभागात दुतर्फा रस्त्यावर वाढलेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची बाब भारतीय जनता पक्षाच्या ठाणे शहर सचिव विजय भोईर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे.
यासंदर्भात भाजपा ठाणे शहर सचिव विजय अनंत भोईर यांनी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, रोशन भगत, समीर चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देऊन या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, दिवा परिसरातील नागरिक दुतर्फा रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे प्रचंड अडचणींचा सामना करत आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी, हाणामारीचे प्रकार, तसेच गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मुंब्रादेवी परिसर, दिवा आगसन रस्ता, दिवा स्टेशन परिसरापासून दिवा टर्निंग या परिसरातून ये-जा करताना मोठ्या अडचणी येत आहेत.
या समस्येमुळे नागरिकांना आणि वाहतुकीला मोठा त्रास होत असल्याने, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भोईर यांनी केली आहे. दिवा विभागातील रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना हटवल्यास नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना होणारा त्रास कमी होईल, तसेच वाहतुकीचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटेल असे पत्रात म्हटले आहे.