पाईपलाईन साठी शिवसेनेचे प्रयत्न,प्रशासनाच्या दिरंगाईमुळे दिवा-साबे गावचा पाणी प्रश्न सुटण्यास अडथळा!
दिवा:-दिवा शहराचा पाणी प्रश्न सुटावा या हेतूने दिवा-शीळ ही नवी पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर होऊन त्याची वर्क ऑर्डर देखील निघाली मात्र दोन वर्षे झाली तरी या कामाचा शुभारंभ करण्यास ठाणे महापालिका प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याने दिव्याच्या पाणी टंचाई बाबत महापालिका खरच गंभीर आहे का?असा प्रश्न निर्माण होत आहे.
दिवा शहरात पाणी टंचाई असल्याने येथील नागरिक कायम पालिका प्रशासनाकडे पाणी समस्या सोडवण्याची मागणी करत असतात.वाढते दिवा शहर आणि होणारा अपुरा पाणी पुरवठा यावर तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासना मार्फत दिव्यात पाणी पुरवठा बाबत नव्याने पाईपलाईन टाकण्याचे काम अनेक भागात सुरू आहे.मात्र असे असले तरी पाणी टंचाई जैसे थे आहे.दिवा गाव,साबे गाव,स्टेशन परिसर या भागातील नागरिकांना सध्याच्या घडीला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही.याभागात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिके मार्फत उपाययोजना केल्या जात असताना त्या अपुऱ्या ठरत असतात. येथील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने व शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक शैलेश पाटील व इतर नगरसेवकांच्या पाठपुराव्याने शीळ फाटा ते दिवा ही नवी पाणी पुरवठा पाईपलाईन मंजूर झाली. सत्ताधारी शिवसेनेने पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला मात्र या पाईपलाईनच्या कामाची वर्क ऑर्डर निघून दोन वर्षे झाली तरी अद्याप कामाला सुरुवात न झाल्याने पालिका प्रशासन व संबंधित अधिकारी यांना नक्की दिव्याच्या पाणी प्रश्नाचे गांभीर्य आहे का?असा प्रश्न विचारला जात आहे.पाईपलाईन चे काम रखडलेले असताना प्रशासन मात्र अलायमेंट बदलणे यासारखी तकलादू कारणे देऊन वेळ काढण्याचे काम करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.दिवा शीळ नवीन पाणी पुरवठा लाईन साठी जवळपास साडे सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.एकीकडे नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असताना प्रशासनाकडून मंजूर कामाच्या बाबतीत होणारी दिरंगाई यामुळे नागरिकांत संताप आहे.
शिवसेनेच्या प्रयत्नाने दिव्यात अनेक ठिकाणी नव्या पाईपलाईन टाकल्या जात आहेत.येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा,दिवा साबे व स्टेशन परिसर याभागात पाणी वितरण पुरेशा प्रमाणात व्हावे या हेतूने शिवसेनेच्या पुढाकाराने शीळ दिवा पाईपलाईन मंजूर करण्यात आली,यासाठी निधीही मंजूर आहे,वर्क ऑर्डर निघाली असून लवकरात लवकर काम सुरू करून प्रशासनाने काम सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा ही आमची मागणी आहे.-शैलेश पाटील,माजी नगरसेवक
महिन्या भरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.अंदाजपत्रक 2014-15चे होते.अलायमेंटचे काम बाकी होते,त्यामुळे काम रखडले होते.पाईपलाईनचा व्यास बदलण्याचे काम सुरु आहे.सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर काम सुरू होईल!-अर्जुन आहिरे
उपनगर अभियंता
पाणी पुरवठा विभाग