पालिका आयुक्त दिव्यातील नालेसफाईकडे लक्ष देतील काय ?
◆ दिवा न्यूज रोखठोक/सुहास खंडागळे
दिवा शहर हे काही नियोजित शहर नाही.जशी जागा मिळेल तशा पद्धतीने वाढलेलं हे शहर आहे. परिणामी शहरात असणाऱ्या नैसर्गिक नाल्यांची संपूर्ण सफाई दर पावसाच्या आधी होणे गरजेचे आहे. ही वास्तविकता दिवा शहरात काम करणाऱ्या दिवा प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना माहित नाही का? हा आमचा प्रश्न आहे.जर आपण नालेसफाई ही शहर स्वच्छतेची परीक्षा म्हटली, तर यात ठाणे महानगर पालिकेचे दिव्यातील प्रशासन ढ आहे असेच म्हणावे लागेल.
मुळात ज्या शहराचे पालकत्व तुमच्याकडे आहे. त्या शहराची जबाबदारी काळजीपूर्वक सांभाळणं हे येथील प्रशासनाचे काम आहे. दर पावसाळ्यात दिव्यातील नालेसफाईचा बोजवारा उडतो.रस्त्यांवर आणि बैठ्या चाळीत पाणी साचते. प्रशासन यातून मागील काही वर्षात शिकत नसेल,तर असं प्रशासन दिव्यात हवं कशाला? हाही प्रश्न आहे.पावसाच्या पाण्याने आपोआप नाले साफ होण्याचे तंत्रज्ञान या अधिकारी आणि ठेकेदारांनी विकसित केले आहे का ?असा प्रश्न या निमित्ताने पडतो.
शहरातील संपूर्ण पाण्याचा निचरा होण्यासाठी दिव्यात असणाऱ्या मुख्य नाल्यांचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे.प्लास्टिकच्या पिशव्या काढून त्या एका ठिकाणी गोळा करून ठेवणे याला नालेसफाई म्हणता येणार नाही. दिव्यात काम करणाऱ्या नालेसफाईच्या ठेकेदारांना कदाचित हेच वाटत असावे.दर पावसाळ्याआधी नाल्यांमध्ये असणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करायच्या आणि त्या नाल्याच्या बाहेर काढून ठेवायच्या… पाऊस पडला की पुन्हा त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या नाल्यामध्ये पुन्हा वाहून जातील आणि आपली नालेसफाईची हात सफाई होईल, अशा काहीतरी विचित्र जगात येथील नालेसफाई करणारे ठेकेदार आणि अधिकारी वावरताना दिसतात.
नाल्यातून बाहेर काढलेला कचरा वेळेत टाकला पाहिजे असं यांना का वाटत नाही.गटारातून काढलेला चिखल काही ठिकाणी न उचलला तिथेच ठेवला जातो. पाऊस पडला की पुन्हा तोच चिखल गटारात जातो… अरे मग तो चिखल काढण्याची तसदी हे लोक का घेतात?हेच कळत नाही.
दिव्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची चिंता आणि काळजी येथील प्रशासनाला नाही. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता असंच म्हणावं लागेल. दिव्यात नाल्यांचे खोलीकरण झाल्याचे मागील काही वर्षात आठवत नाही. मशीनच्या सहाय्याने इथे उत्तम दर्जाची नालेसफाई झाले असं एकदाही पहायला मिळालं नाही. पाऊस सुरू झाला, पाणी साचायला लागले की जेसीबी घेऊन त्या ठिकाणी जायचं आणि तिथला नाला मोकळा करून द्यायचा असेच प्रकार दिव्यात पाहायला मिळतात.हे नालेसफाईचे दुर्दैव आहे. नगररचना, नगर विकास याबाबतीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे दिवा शहराकडे सपशेल दुर्लक्ष झालेल आहे. ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी याकडे लक्ष द्यायला हवं. आज दिवा शहराची लोकसंख्या साधारण पाच लाखाच्या घरात आहे.दिवा शहराचा विस्तार हा झपाट्याने झालेला आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येचा वावर दिवा शहरात असताना काही मूलभूत प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत.
ड्रेनेजचा प्रश्न निर्माण झाला आहे.इमारतींचे सांडपाणी वाहून न्यायची यंत्रणा अस्तित्वात नाही.शहरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात राहत असताना, असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये येथे सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा निर्माण केली गेली का? याचा विचार महापालिकेने करायला हवा. तो विचार महापालिकेने केला असता तर अंतर्गत गटारे तुंबून त्यातून सांडपाणी बाहेर रस्त्यावर आले नसते. पावसाळा तोंडावर असतानाही दिव्यातील मुख्य नाल्यांची सफाई न होणे, त्यातील गाळ न काढणे हे कशाचं लक्षण म्हणावं? याला दिवा शहरातील लोकांना गृहीत धरणे असेच म्हणता येईल.
नालेसफाई नीट न झाल्याने घाणीचे पाणी रस्त्यावर साचू लागले आणि त्यातून नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? याचं उत्तर ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने द्यायला हवं.
दिव्यात नालेसफाईत चालढकल करणाऱ्या आणि नालेसफाईच्या नावाने हातसफाई करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.महापालिका आयुक्तांनी याविषयावर स्वतंत्र बैठक आयोजित करायला हवी. दिवावासीयांना स्वच्छतेची हमी देताना नालेसफाई नियमानुसार होईल याकडे लक्ष द्यायला हवे…ठाणे शहराचे प्रशासकीय प्रमुख म्हणून आयुक्त हे करतील,नागरिकांना दिलासा देतील हीच अपेक्षा!