◆लोकसंख्येच्या प्रमाणात पालिका शाळांची संख्या न वाढल्याने दिव्यात अनधिकृत शाळांची संख्या वाढली-ज्योती पाटील
◆ दिवा प्रभाग समिती क्षेत्रात महापालिकेच्या 14 शाळा, अनधिकृत शाळांची संख्या 60 च्या वर
■ सुहास खंडागळे
दिवा:-एकीकडे ठाणे महानगरपालिका अनधिकृत शाळांचे बॅनर दिवा शहरातील रस्त्यांवर लावत असताना दुसरीकडे याच महापालिकेने दिवा शहराची लोकसंख्या वाढत असताना शहरातील महापालिका शाळांची संख्या त्या तुलनेत वाढवली नसल्याची बाब समोर येत आहे.साधारण पाच लाख लोकसंख्येच्या दिवा शहरासाठी अवघ्या सहा शाळा अस्तित्वात असून दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात पालिकेच्या एकूण 14 शाळा असल्याची बाब समोर येत आहे.तर दुसरीकडे दिवा शहर परिसरात 58 अनधिकृत शाळा असल्याची माहिती समोर येत आहे.
दिवा शहर आणि परिसरात दिवा स्टेशन शाळा क्रमांक 79, शाळा क्रमांक 98, साबेगाव शाळा क्रमांक 80 बेतवडे शाळा क्रमांक 83, आगासन शाळा क्रमांक 88, दातिवली शाळा क्रमांक 94 या पालिकेच्या शाळा असून प्रभाग समिती कार्यक्षेत्रात खिडकाळी, डायघर, पडले गाव, खर्डी पाडा, वेताळ पाडा, फडके पाडा,शीळगाव अशा एकूण 14 शाळा सुरू आहेत.
पालिकेच्या शाळांपेक्षा दिवा शहरात अनधिकृत शाळांची संख्या ही दहा पटीने अधिक आहे.दिवा शहरात राहणारा सर्वसामान्य नागरिक हा नोकरदार वर्ग आहे. परिणामी या वर्गाला महागड्या खाजगी शाळा मधील शिक्षण परवडत नाही. दिव्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या अधिकृत खाजगी शैक्षणिक संस्था आहेत. या शाळांची फी सर्वच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल अशी नाही.
एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ठाणे महानगरपालिकेने देखील दिवा शहरात शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दिवा शहरात ठाणे महानगरपालिकेच्या शाळांची संख्या वाढायला हवी होती.त्याचबरोबर असलेल्या शाळांमध्ये वर्ग संख्या देखील वाढवायला हवी होती.मात्र महापालिकेकडून अपुऱ्या शैक्षणिक सुविधा दिवा शहरात उपलब्ध असल्याने दिवा शहरात अनधिकृत शाळांचे पेव वाढले.परिणामी गल्लीबोलात सुरू झालेल्या आणि कमी फी असणाऱ्या अनधिकृत शाळांमध्ये दिवा शहरातील पालक वर्ग आपल्या पाल्याचे ऍडमिशन घेताना दिसू लागले. एकीकडे महापालिका दिवा शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करत असताना पर्यायी व्यवस्था नागरिकांसाठी व पाल्यांसाठी काय? याकडे मात्र ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने डोळेझाक केलेली पाहायला मिळते, असे मत या विषयावर मागील सहा महिन्यांपासून पाठपुरावा करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या शहर संघटिका ज्योती पाटील यांनी याबाबत बोलताना व्यक्त केले आहे.
दिवा शहरातील नोकरदार वर्ग लक्षात घेऊन त्या तुलनेत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी असताना केवळ अनधिकृत शाळांचे बॅनर लावून शिक्षणासारखा महत्त्वाचा प्रश्न असाच अधांतरी ठेवता येईल का ? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
पालिकेने स्वतःच्या शाळांची संख्या न वाढवता फक्त अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका असे बॅनर पालिके मार्फत लावणे हे खाजगी शाळांच्या पथ्यावर पडणारे धोरण नाही का? असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
जर तुम्ही अनधिकृत शाळा बंद करा असे म्हणत असाल तर ठाणे महानगरपालिकेने स्वतःच्या शाळांची संख्या वाढवायला हवी किंवा अनधिकृत शाळा असणाऱ्या शाळांना नियमांची पूर्तता करून अधिकृत करायला हवे अशी ही भूमिका आता दिवा शहरातील नागरिक मांडताना दिसतात. एकंदरीत ठाणे महानगरपालिकेच्या शैक्षणिक धोरणाचा फज्जा दिवा शहरात उडाला असून वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत दिवा शहरात शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास ठाणे महानगरपालिका अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
“ मागील काही महिन्यांपासून दिवा शहरातील महापालिका शाळांची संख्या वाढवावी यासाठी मी पालिका आयुक्त आणि शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. तसा पत्रव्यवहार केला आहे.मात्र अद्याप दिवा शहरातील महापालिका शाळांची संख्या वाढलेली नाही. दिवा शहरातील महापालिका शाळांची संख्या वाढली तर येथील पालकांना मोठा दिलासा मिळेल “
– ज्योती राजकांत पाटील
शहर संघटिका, शिवसेना(ठाकरे गट)