अधिवेशनात कठोर कायद्याची मागणी करणार- आ. केळकर
ठाणे:- नवीन गृह प्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर खासगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातूनही बेरोजगार तरुणाची फसवणूक होत आहे. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमातून आम्ही शेकडो कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असून मी येत्या पावसाळी अधिवेशनात फसवणूक करणाऱ्या विकासकांना आणि प्लेसमेंट केंद्रांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात दर सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा लोकांच्या समस्या सोडविणारा कार्यक्रम होत असून आज सोमवारी श्री.केळकर यांनी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आगामी अधिवेशनात वाचा फोडणार असल्याची माहिती दिली.
ठाणे शहराला घरांसाठी पहिली पसंती मिळत असल्याने ठाण्यात नवीन गृहप्रकल्प आणि पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र बऱ्याचदा या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होते. पैसे भरूनही १० ते १५ वर्षे लोकांना घरे मिळत नाहीत, भाडे थकविले जाते, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. विकासकाकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत जनता दरबारात अनेक प्रकरणे दाखल होत आहेत. यातील अनेकांना न्याय देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. यशस्वीनगरमध्ये पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली मालमत्ता पत्रके मिळवून दिल्याने येथील २८ इमारतींच्या पुनर्विकास योजनेचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.
बेरोजगार तरुणाची आर्थिक फसवणूक करणारी खासगी प्लेसमेंट कार्यालये शहरात मोठ्या प्रमाणात झाली आहेत. या व्यवसायाला कोणतीही बंधने नसल्याने कोणीही हा व्यवसाय सुरू करत आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने हे सेंटर तरुणांकडून सेवा शुल्काच्या माध्यमातून लाखो रुपये उकळतात, मात्र नोकरी मिळत नसल्याने या तरुणांची मोठी फसवणूक होत असते. याबाबत भाजपच्या युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला असून अनेक ठिकाणी धडक देऊन तरुणांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यवसायावर कायदेशीर निर्बंध यावेत यासाठी देखील पावसाळी अधिवेशनात कठोर कायद्याची मागणी करणार असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.
दिखाऊ नाही तर फलदायी उपक्रम
जनता दरबार हा उपक्रम भाजपासाठी नवीन नसून स्टेशनजवळील जुन्या कार्यालयात सुरू झालेला हा उपक्रम गेली ३५ वर्षे सुरूच आहे. सध्या खोपट येथे सुरू असलेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमातून दर सोमवारी आणि शुक्रवारी शेकडो लोकांशी संवाद साधला जात असून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमात नवीन गृहप्रकल्पात विकासकाकडून फसवणूक, प्लेसमेंटच्या माध्यमातून तरुण बेरोजगारांची फसवणूक, म्हाडा इमारतींची वाढीव पाणीपट्टी, एसआरए योजनेतील फसवणूक, कामगारांचा वारसाहक्क अशा अनेक तक्रारी घेऊन लोक येतात. त्यांना न्याय मिळत असल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद असतो. त्यामुळे हा उपक्रम दिखाऊ नसून खऱ्या अर्थाने फलदायी उपक्रम असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी मांडले.