Homeशहर परिसरफेरीवाल्यांच्या विरोधात दिवा मनसे शुक्रवार पासून उतरणार रस्त्यावर

फेरीवाल्यांच्या विरोधात दिवा मनसे शुक्रवार पासून उतरणार रस्त्यावर

दिवा:- दिवा शहरातील रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले असून दिवा मनसे आता मनसे स्टाईलने रस्ते मोकळे करणार असल्याचे मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी जाहीर केले आहे.
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडून ठेवलं आहे. विशेषतः स्टेशन परिसरात तर लोकांना रस्त्यावरून चालणेही जिकरीचे झाले आहे. पालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांकडून दिवसाला २० रुपये जमा करतात, ज्यामुळे फेरीवाले रस्ता स्वतःच्या मालकीचा असल्याच्या आविर्भावात वावरतात. कित्येक वेळा सामान्य नागरिकांना फेरीवाल्यांकडून दादागिरी केली जाते असे दिवा मनसे कडून सांगण्यात आले. याआधी महापालिकेकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला पण, प्रत्येक वेळी महापालिकेकडून फक्त नावापुरती कारवाई केली जाते. महापालिकेची गाडी कारवाई साठी निघायच्या आधीच फेरीवाल्यांना माहिती पोहचवली जाते. महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी नेमलेले पथक फक्त फेरीवाल्यांच्या टोपल्याना हात लावून फोटोसेशन करून घेते आणि कारवाई केल्याचे सांगते असा आरोप मनसेने केला आहे.

वेळोवेळी पाठपुरावा करूनही महापालिकेला रस्ते फेरीवाले मुक्त ठेवण्यात स्वारस्यचं नसल्याने अखेर दिवा मनसे आता रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी म्हटले आहे. शुक्रवार, दिनांक २५ ऑगस्ट पासून मनसेचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतील. यावेळी कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास ठाणे महानगरपालिका जबाबदार असेल असे त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!