दिवा : बेतवडे गावातील भूमीपुत्रांना गेल्या दहा वर्षांपासून न्याय्य मोबदला न मिळाल्याच्या आरोपावरून मॅरेथॉन बांधकाम व्यावसायिका विरोधात सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास मुंडे आणि दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाच्या वतीने पाठिंब्याचे पत्र आंदोलकांच्या प्रतिनिधींना सुपूर्द केले.
यावेळी बोलताना रोहिदास मुंडे आणि सचिन पाटील यांनी, “भूमीपुत्रांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. भूमाफियांच्या मुसक्या आवळल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना त्यांचा न्याय्य मोबदला मिळाल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” अशी भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनीही आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या आंदोलनाला विविध सामाजिक आणि राजकीय स्तरातून पाठिंबा मिळत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.






