ठाणे:- मुंब्रा-पनवेल रोडवरीलन उत्तर शिव, भंडार्ली गाव परिसरात तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या पत्र्याच्या दोन गोडाऊनला गुरुवारी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत एका गोडाऊन मध्ये असलेल्या गाडीतील २५ ते ३० बकऱ्यांपैकी १२ बकऱ्यांचा आगीमुळे झालेल्या धुरात गुदमरून मृत्यू झाला आहे. तसेच ही आग दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. यावेळी ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या मदतीला नवीमुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे अग्निशमन दलाचे जवान धाव आले होते.
भांडर्ली गाव येथे पुठ्ठा, रबर व इतर भंगार साहित्य असलेल्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी डायघर पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली.पुठ्ठा, रबर व इतर भंगार साहित्य असल्याने आगीने क्षणात रुद्र रूप धारण केले. या आगीची झळ बाजूच्या आणखी एका गोडाऊन बसली. अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तेंव्हा कुठे ती आग दोन तासांनी नियंत्रणात आली. तसेच यावेळी झालेल्या मोठया प्रमाणातील धुरामध्ये एका गाडीत असलेल्या १२ बकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची बाब समोर आली. अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.