ठाणे:- राज्याच्या राजकारणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आक्रमक शैलीत शाब्दी फटकेबाजी करताना आपण पाहतो. पण, बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क हाती क्रिकेट बॅट घेऊन अक्षरशः एका पाठोपाठ चौकार आणि षटकार टोलवले. या त्यांच्या आक्रमक फटकेबाजीने भिवंडी तालुक्यातील माणकोली येथील मैदान त्यांच्या आक्रमक खेळीने मंत्रमुग्ध झाल्याचे पाहण्यास मिळाले.
भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे आयोजित “केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025” च्या अंतिम सामन्याच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी भेट दिली. तदपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हाती क्रिकेटची बॅट घेऊन चेंडू सीमा रेषा पार केले. मुख्यमंत्र्यांची आक्रमक फलंदाजी पाहून उपस्थित राजकीय पुढाऱ्यांसह क्रिकेटपटूसह क्रिकेट रसिक भारावून गेले.
दरम्यान यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला आनंद आहे की, या स्पर्धेला माझी दरवर्षी उपस्थिती असते. मात्र यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावण्याची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती. कारण अधिवेशन सुरू होते. आज इथे इतका मोठा कार्यक्रम होतो आहे. बक्षीस म्हणून 51 बाईक्स आहेत, 2 इलेक्ट्रिक कार आहेत. मला असे वाटते की, या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा सोहळा हा असून संपूर्ण देशातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, कपिलजी सांगत होते की, माजी झालो तरी लोकं मोठ्या संख्येने आले. मात्र आपण कधीच माजी होत नाही. निवडणुका येत असतात, जात असतात. लोकांच्या मनामध्ये आपण कायम असायला हवे. लोकांच्या मनातून माजी झालो नाही म्हणजे सगळं मिळवले, असे समजायचे.
याप्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयोजक प्रताप पाटील, क्रिकेटचे विविध संघ, खेळाडू, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.