राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे.
ठाणे: लोकशाहीमध्ये मतदारांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि लोकशाही जीवंत असल्याचा कानमंत्र किंवा प्रवचन जे नेहमी देत असतात तेच विकासाबद्दल प्रश्न विचारल्यावर विचलित होत असतात. महायुती सरकारकडून मुंब्रा कळवा मतदारसंघातील विकासासाठी आतापर्यंत १५० कोटींचा विकास निधी देण्यात आला आहे. यातील काही कामे सुरु झाली आहेत, काही टेंडर निघून कामे मार्गी लागतील. न्यायदेवतेच्या हाती आता संविधान आहे, डोळ्यावरच्या पट्टीऐवजी डोळे उघडे आहेत, हा देश परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानावर चालेल हा संदेश देणाऱ्या बदलाचे स्वागत सर्व भारतीयांनी केले पाहिजे. विसंगतीसह मुख्यमंत्रीपदावरुन एक शर्यतही काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा या तीनही पक्षामध्ये दिसून येते. विकासाचे पर्व घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस मतदारांपर्यंत जाणार आहोत. महायुतीचा उमेदवार कमळ घेऊन उभा असेल तिथे कमळाचा प्रचार करु, जिथे धनुष्यबाण घेऊन उभा असेल तिथे धनुष्यबाणचा प्रचार करु, जिथे घड्याळ घेऊन उभा असेल तिथे घड्याळाचा प्रचार करु, असे मत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.






