Homeबिनधास्त बोल‘मुख्यमंत्री दालनात आमचे दिघेसाहेब’

‘मुख्यमंत्री दालनात आमचे दिघेसाहेब’

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना जनसेवेचा वसा पुढे घेऊन जाणारे कट्टर शिवसैनिक मा. एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होण्याचे बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते एकनाथ शिंदेच्या रुपाने पुर्ण झाले, त्याचवेळी तमाम शिवसैनिक आणि आनंद दिघे साहेबांच्या सैनिकांचा ऊर भरुन यावा असा क्षण आज तमाम महाराष्ट्राने पाहिला. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात वंदनीय धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचा फोटो लागला. आम्हाला तर वाटत होते की मा. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहुन दिघे साहेब आशिर्वादच देत आहेत असा हा क्षण होता. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या या प्रतिमेमुळे मुख्यमंत्री दालनात जणू आमचे ठाणेच विराजमान झाले आहे, याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या शिवसैनिकालाच नव्हेतर तमाम ठाणेकरांना आहे.


महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मुंबई – ठाण्यात पोट भरण्यासाठी आलेल्या गरीब कुटुंबातील आमच्या सारखी तरुण पोरं कॉलेज जीवनापासून दोन माणसांच्या विचारांनी झपाटून गेली. त्यातील एक नाव होते वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तर दुसरे नाव होते धर्मवीर आनंद दिघे साहेब…ठाण्याचा ढाण्या वाघ… अन्याया विरोधात लढायला हवे, आपण अन्याय सहन करायचा नाही. आपले मराठीपण या मुंबईच्या गर्दीत मागे पडता कामा नये. मुंबईसह ठाण्यात मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे, या विचारांनी आम्ही झपाटून गेलो. आपल्याला काय व्हायचे आहे, कुठे जायचे आहे, राजकारण कशाशी खातात आणि कसे जगतात यापैकी काहीही माहिती नव्हते, पण अंगात रग होती. दिघे साहेबांनी आदेश दिले की कामाला लागायचे. लोकांसाठी संघर्ष करायचा.. या भावनेतून ठाण्यातून माझ्यासारखे अनेक तरुण दिघे साहेबांच्या पाठीशी उभे राहिले. दिघे साहेबांनी शिवसेना वाढवायला सुरुवात केली. संघटना आक्रमक भूमिका घेऊन काम करू लागली. या काळात एकनाथ शिंदे, मी आणि असंख्य शिवसैनिक उभे राहिले. घरची परिस्थिती बेताची, कुणाची वाईट तर कुणाची तर रोजीरोटीची रोजची लढाई. कोण रिक्षा चालवायचा, कोण वडापावची गाडी चालवायचा, कोण कुठे तरी छोटी – मोठी नोकरी करायचा, पण दिघेसाहेंबानी हाक दिली की, हातातील सगळी कामे बाजूला टाकून त्यांच्या पाठीशी लाखो तरुण उभे राहायचे. एवढेच नव्हे, तर आपला जीव देण्यासाठी तयार व्हायचे. न्याय हक्कासाठी आंदोलने झाली, अनेक वेळा पोलीसांनी मारले, गुन्हे दाखल झाले, अटक झाली पण धर्मवीर आनंद दिघे यांचा शिवसैनिक कधीच मागे हटला नाही. दिघेसाहेब पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यातूनच आमच्या सारख्या अनेकांची करिअर उभी राहिली. कोण नगरसेवक , महापौर , आमदार झाले मंत्री आणि खासदारही झाले, पण दिघेसाहेबांचा सैनिक आजपर्यंत कधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसला नाही. हे भाग्य शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा कट्टर शिवसैनिक असलेल्या मा. एकनाथ शिंदे यांना लाभले.

एकनाथ शिंदे यांचा संपुर्ण प्रवास अत्यंत संघर्षाचा आहे. रिक्षा चालवणारा एक तरुण आनंद दिघे यांच्या झंझावाती कामात सहभागी होऊन आपले आयुष्य संघटनेसाठी देण्यासाठी तयार होतो, त्याला पुढे केवढे मोठे यश येऊ शकते याचे उदाहरणच नव्हेतर एक आदर्श एकनाथ शिंदे यांनी घालून दिला आहे.


दिघेसाहेबांनी जो विचार दिला, तो पुढे न्यायचा. बाळासाहेबांनी सांगितले की, ‘गर्व से कहो.. हम हिंदू आहे. दिघे साहेबांनी सांगितले कुणावर अन्याय होता कामा नये. ही विचारांची शिदोरी घेऊन शिंदे साहेब गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. कोणत्याच पदाची त्यांनी अपेक्षा ठेवली नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्यात जे दु:ख आले त्यालाही मागे टाकून पायाला भिंगरी लागल्यासारखे काम करणारे एक निष्ठावान सैनिक म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. एक साधा कार्यकर्ता, शाखाप्रमुख, महापालिकेत नगरसेवक, सभागृहनेते, आमदार, राज्याचे विरोधी पक्ष नेते, मंत्री आणि आता राज्याचे मुख्यमंत्री एवढा प्रचंड मोठा प्रवास त्यांनी केला. यापाठीमागे त्यांचे अपार कष्ट तर आहेतच. पण दिघे साहेबांचे विचार, आशिर्वाद याचा मोठा वाटा आहे. दिघे साहेबांचे अकाली जाणे दैवालाही पटले नसावे. त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली, त्यांची अनेक स्वप्न अपुरी राहिली होती. त्या स्वप्नांना पुर्ण करण्याचे काम आता एकनाथ शिंदे साहेबांनी हाती घेतले आहे.


आज एकनाथ शिंदे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यांचा तो ऐतिहासिक शपथविधी होत असताना आमचा आनंद तर गगनात मावत नव्हता… पण त्याचवेळी मनात एक सल होती ती म्हणजे हा एवढा मोठा क्षण पहायला आनंद दिघेसाहेब नाहीत. आज दिघेसाहेब जिथे कुठे असतील तिथून हे सगळे पहात असतील अशीच आमची धारणा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रालयातील दालनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे विराजमान होवून राज्याचा कारभार पाहत आहेत, त्यावेळी त्या दालनात ते पाहण्यासाठी दिघे साहेब नक्की आहेत अशीच आमची धारणा आहे.


मुख्यमंत्री दालनात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबतच धर्मवीर आनंद दिघे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. हा फोटो पाहून माझ्या सारख्या असंख्य दिघेप्रेमी माणसांचा ऊर भरुन आपल्याशिवाय राहणार नाही. आज मुख्यमंत्रीपदावर त्यांचा एक सैनिक विराजमान झाला, त्याच दालनात दिघे साहेबांचा वावर आहेच असे आम्ही मानतो. दिघेसाहेबांनी कधीच सत्तेच्या खुर्चीची अपेक्षा केली नाही. स्वत: एक संन्यासाप्रमाणे जगले. पण अनेकांच्या आयुष्याचे ‘नंदनवन’करून गेले. त्यांचा महाराष्ट्रात असा कधी तरी बहुमान व्हावा अशी आमची इच्छा होती .. ती आज पुर्ण झाली आहे. हे सुख आम्हाला अचानक अनपेक्षितपणे मिळाले. भाजपाचे नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठे मन दाखवले. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना जो बहुमान दिला हा बहुमान आमच्या दिघे साहेबांचा आहे. त्यांनी आयुष्यभर जो संघर्ष केला त्या संघर्षाचा आहे. हा बहुमान आमच्या ठाण्याचा आहे… सामान्य माणसाचा आहे. सामान्य माणसाच्या लढ्यासाठी दिघे साहेबांनी जे उभे आयुष्य खर्च केले.. त्या आयुष्याला आज ख-या अर्थाने महाराष्ट्राने ‘सलाम’ केला आहे. त्यामुळे आज मंत्रालयावर शिवसेना भाजपा युती सरकारचा भगवा झेंडा फडकतो आहे.. त्या भगव्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या दिघे साहेबांचे भगवे विचार मिसळले आहे. खरं तर दोघेही आमच्यासाठी वेगळे नाहीत. तसेच दोघांचे भगवे झेंडे ही वेगळे नाहीत. दोघांनीही आम्हाला हेच शिकवले ‘गर्व से कहो हम हिंदु है’ .. ‘जयहिंद’आणि ‘जय महाराष्ट्र’..

“दिघे साहेबांची आठवण रोजच येते कारण ते आमच्या हृदयात आहेत, पण आज दिघेसाहेबांचा ठाणेकर शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचे स्वप्न साकार झाले आहे, आज त्यांची खूपच आठवण येते.. त्यांच्यासमोर उभं राहून ‘साहेब’ ‘जय महाराष्ट्र’ असे जोराने म्हणावेसे वाटते….”

-नरेश म्हस्के, माजी महापौर ठाणे
error: Content is protected !!