ठाणे : येथील घोडबंदर भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे लवकरच ही समस्या मार्गी लागले, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने शुक्रवारी आमदार संजय केळकर यांना दिले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी विधानसभेत केळकर यांनी घोडबंदर भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्याऐवजी ठाणे महापालिका टँकरमाफियांना पोसत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केळकरांना आश्वासन दिल्यावर जर का तरी ही पाणी समस्या सुटली नाहीतर नागरिकांसह आंदोलन करण्याचाच इशाराही यावेळी दिला.
घोडबंदरच्या पाणी पुरवठ्याचा कृती आराखडा ठरविण्यासाठी महापालिकेत शुक्रवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार केळकर यांच्यासह महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार तसेच घोडबंदर भागातील नागरिक उपस्थित होते. ज्या भागात पाणी टंचाईची समस्या आहे, त्याठिकाणी मुबलक पाणी कसे उपलब्ध होईल. त्यासाठी जलवाहीन्या टाकणे, अतिरिक्त पाणी पुरवठा करणे, अशा उपाययोजना करण्याचे काम सुरु असून हे काम लवकरच पुर्ण होऊन या भागातील पाणी समस्या सुटेल, असे आश्वासन प्रशासनाने बैठकीत दिले.