ठाणे: वसई आणि भाईंदर ही शहरे एकमेकांना जलमार्गाने जोडणाच्या दृष्टीने, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मे. सुवर्णदुर्ग शिपींग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. या ऑपरेटर संस्थेद्वारे २० फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात आलेली वसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सेवा ही तूर्तास फक्त प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आलेली आहे. या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारिक शासकीय लोकार्पण सोहळा अद्याप झालेला नाही. असे प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुंबई, मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रवीण एस्. खरा यांनी काढले आहे.
या रो – रो सेवेमुळे भाईंदर व वसई किनारपट्टी असा प्रवास वाहने घेऊन करता येणार आहे. मंगळवारी आमदार क्षितीज ठाकुर हे वाहनाने बोटीतून बाहेर पडले. त्यानंतर बोट पुन्हा वसईच्या दिशेने रवाना झाली. तर दुसऱ्या बोटीवर खासदार राजन विचारे यांच्या हस्ते रो रो सेवेचे फीत कापून व श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. परंतु आता हे लोकार्पण औपचारीक नसल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने एका प्रसिध्दी पत्रकारद्वारे स्पष्ट केले आहे. या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारीक शासकीय लोकापर्ण सोहळा अद्याप झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तूर्तास या फेरीबोटीचे जलमार्गातून होणारे नौकानयन तसेच बोटीतून प्रवासी व वाहनांची जेट्टीवर चढ उतार सुलभ व सुरक्षितपणे होत आहे किंवा कसे, या बाबींचा महाराष्ट्र सागरी मंडळाकडून अभ्यास करण्यात येत आहे. या सर्व बाबींची एकदा खात्री झाल्यानंतरच, फेरीबोट सेवेचा शासकीय लोकापर्ण सोहळा करण्यात येणार आहे. त्यामुळे वसई, भार्इंदर या रो – रो फेरीबोट सेवेचा शासकीय लोकार्पण सोहळा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी ते चुकीचे असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई मुख्य बंदर अधिकारी खरा यांनी स्पष्ट केले आहे.