दिवा:-शहरातील समर्थ नगर येथील पाण्याच्या सबलाईन आणि रस्त्याच्या कामाची आ.राजू पाटील यांनी पाहणी केली.
दिव्यातील समर्थ नगर परिसरात असलेल्या मुख्य रस्त्यावरून मुंब्रादेवी कॉलोनी, रिलायन्स टॉवर या भागात पाणी वाहून नेण्यासाठी प्लास्टिकचे पाईप टाकण्यात आले होते. हे पाण्याचे पाईप मुख्य रस्त्यावर असल्याने ते वारंवार फुटून संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले जात होते, शिवाय पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत होती. रस्त्यावर असलेल्या सततच्या पाणी आणि चिखलामुळे रस्ता देखील खराब झाला होता, त्यामुळे या रस्त्यावरून प्लास्टिकचे पाईप काढून एक वेगळी सबलाईन टाकण्यात यावी तसेच खराब झालेला रस्ता पुन्हा नव्याने बांधण्यात यावा अशी मागणी दिवा मनसे तर्फे पत्रव्यवहार करून वेळोवेळी करण्यात आलेली होती.
मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि पाणी खात्याचे अधिकाऱ्यांची याच विषयावर भेट घेऊन निवेदन दिले होते. गणेशोत्सवाच्या काळात दिवा मनसेच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने या रस्त्याची खडी टाकून तात्पुरती डागडुजी केली होती.
आता पावसाळ्यानंतर अखेर नवीन सबलाईन टाकण्याच्या आणि नवीन रस्ता बनवण्याच्या कामाला महापालिकेकडून सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता तरी या परिसरातील लोकांची चिखलाच्या रस्त्यातून सुटका होईल म्हणून त्यांनी दिवा मनसेचे आभार व्यक्त केले आहे.






