आमदार संजय केळकर यांच्याकडे घेतली धाव.
ठाणे:- मोघरपाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मेट्रो कारशेडसाठी संपादित करण्यात आल्याची घोषणा झाली असली तरी येथील बाधित शेतकरी दोन वर्षांपूर्वी मुंबईत सह्याद्री बंगल्यावर झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यानुसार पुनर्वसन व्हावे अशी मागणी करत सुमारे २५० भूमिपुत्रांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेत व्यथा मांडली.
मेट्रो कारशेडचा प्रश्न अद्याप संपला नसल्याचे मोघरपाडा येथील बाधित १६७ भाडेपट्टेधारक आणि ३२ अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे. एमएमआरडीएने कारशेडसाठी मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन ताब्यात घेतली आहे. पट्टेधारक शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमीनक्षेत्राच्या २२.५ टक्के भूखंड अतिक्रमणधारकांना त्यांच्या मूळ जमीनक्षेत्राच्या १२.५% भूखंड देण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने जाहीर केले आहे. मात्र या निर्णयाशी बाधित शेतकरी सहमत नसून ते दोन वर्षांपूर्वी झालेल्या निर्णयावर ठाम आहेत. २०२२ साली मुंबईत सह्याद्री येथे झालेल्या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना तेथील जमिनी कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी अनेक निर्णय घेण्यात आले होते. त्यानुसारच मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र भूसंपादन झाल्यानंतर शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली. आमचा विकासाला विरोध नाही पण पूर्वी जे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका मांडली.
याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, भूमिपुत्रांना कायमस्वरूपी भूखंड देण्याचा निर्णय झाला होता. हे शेतकरी वर्षानुवर्षे जमीन कसत आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी एमएमआरडीए, जिल्हाधिकारी आणि संबंधित प्राधिकरणांशी मी बोलत असून पुढील काळात या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास श्री.केळकर यांनी व्यक्त केला.