पालिका प्रशासन ‘वन-वे’ आणि रिक्षा थांब्यांचे नियोजन का करत नाही?
दिवा शहर वाहतूक कोंडीमुक्त होण्यासाठी प्रशासनाच्या एका सकारात्मक पावलाची गरज.
दिवा:- मागील काही वर्षांत दिवा शहरात सिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे पायाभूत सुविधांच्या विकासाचा पाया भक्कम झाला आहे. उत्तम दर्जाचे रस्ते हे शहराच्या प्रगतीचे लक्षण मानले जाते.रस्ते विकासा बरोबर आता वाहतूक नियोजनाची गरज आहे.शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या हे एक आव्हान असले तरी, योग्य नियोजनाद्वारे या आव्हानाचे संधीत रूपांतर करता येऊ शकते.पालिकेने यासाठी आताच दिवा शहरात वाहतूक नियोजन हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा.
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्याने प्रवासाचा वेग वाढण्यास मदत झाली आहे. पायाभूत सुविधांचा हा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात या रस्त्यांचा प्रभावीपणे कसा वापर करता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. दिवा शहरातील अंतर्गत वाहतुकीचा कणा असलेली रिक्षा सेवा अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. शिवाय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देखील यामुळे मदत होऊ शकते.यासाठी प्रमुख ठिकाणी नियोजनबद्ध रिक्षा थांबे आणि मार्गिका निश्चित करणे, हे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
‘वन-वे’ ठरू शकतो वाहतूक कोंडी मुक्तीचा राजमार्ग:
दिवा शहरातील बहुतांश अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. यातील अनेक रस्ते दुहेरी वाहतूक करण्यासारखे नाहीत.या वस्तुस्थितीकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता, या रस्त्यांचा उपयोग ‘एकेरी वाहतुकीसाठी’ (वन-वे) केल्यास वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवता येईल.विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळी, रेल्वे स्थानकाकडे जाणारे आणि शहराबाहेर पडणारे मार्ग एकेरी केल्यास वाहतूक कोंडीची समस्या मुळापासून सुटू शकते. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि इंधनाचीही बचत होईल. मुख्य रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा ‘वन-वे’ म्हणून वापर करणे, हे चांगले नियोजन ठरू शकते.
प्रशासनाच्या एका निर्णयाची प्रतीक्षा:
रस्त्यांचे जाळे तयार झाल्यानंतर पालिका प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस प्रशासन दोघांनी सहकार्याने या रस्त्यांवर शिस्त आणि नियोजन आणण्याची गरज आहे. बेशिस्तपणे प्रवासी भरणार्या रिक्षाचालकांचे समुपदेशन करून आणि त्यांना निश्चित थांबे उपलब्ध करून दिल्यास वाहतुकीला आपोआप शिस्त लागेल.वेळप्रसंगी बेशिस्त वाहनचालक आणि रिक्षा चालक यांच्यावर कारवाई गरजेची आहे.
एकंदरीत, दिवा शहराच्या विकासासाठी नियोजन आवश्यक आहे.चांगले रस्ते उपलब्ध आहेत आणि वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ‘वन-वे’ सारखे प्रभावी पर्यायही समोर आहेत. आता गरज आहे ती फक्त पालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे एक सकारात्मक पाऊल उचलण्याची. त्यांच्या एका योग्य निर्णयामुळे दिवा शहराचा चेहरामोहरा बदलून नागरिकांना ‘सुकर आणि गतिमान’ प्रवासाचा अनुभव मिळू शकेल.पालिका प्रशासन याकडे लक्ष देईल का? हा जाणकार नागरिकांचा प्रश्न आहे.






