दिवा:-दिव्यातील अनधिकृत शाळा बंद होत नाहीत म्हणून अधिकृत शाळा 1 जुलैपासून बंद ठेवल्या गेल्या व विद्यार्थ्यांचे नुकसान केले गेले तर अशा संस्था चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करा,अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवा सचिव प्रशांत गावडे यांनी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे यांनी याबाबत ठाणे शहर पोलीस आणि ठाणे महानगरपालिका यांना सोशल मीडिया एक्स वर याबाबत पोस्ट करून विनंती केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, अनधिकृत शाळांवर कारवाई होत नाही म्हणून अधिकृत शाळा बेमुदत बंद हा काय प्रकार आहे? त्या शाळा बंद झाल्या तर आपल्या शाळेत विद्यार्थी वाढतील यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान करायचे ही कसली प्रवृत्ती?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान करून कोणते हित साधले जाणार आहे . नियमबाह्यपणे शाळा बंद ठेवल्या गेल्या तर अशा संस्था चालकाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणीच प्रशांत गावडे यांनी केली आहे. दिव्यात अनधिकृत शाळांचा प्रश्न गंभीर आहे.पालिका प्रशासन यावर ठोस कारवाई करत नाही.मात्र यासाठी अधिकृत शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांचे नुकसान का करायचे?अनधिकृत शाळा बंद होत नाहीत म्हणून अधिकृत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय काही संस्था चालकांनी जाहीर केला होता. याला आता दिव्यातील सर्वसामान्य जनतेतून विरोध होताना दिसत आहे.जर विद्यार्थ्यांकडून फी घेऊन तुम्ही स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणार नसाल आणि अनधिकृत शाळा बंद व्हाव्यात म्हणून स्वतःच्या शाळा बंद ठेऊन यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असेल तर यातून विद्यार्थ्यांचे कोणतेही हित साधले जाणार आहे? असा प्रश्न आता प्रशांत गावडे यांनी यानिमित्ताने विचारला आहे.