Homeसंपादकीय'जीना' मुश्कील है!

‘जीना’ मुश्कील है!

सडेतोड/सुहास खंडागळे

बुधवारी दिवा रेल्वे स्थानकात दोन उदघाटने झालेला एकच जीना आज गुरुवारी काही तांत्रिक कारणाने बंद पडला.काही काळाने दुरुस्ती होऊन तो पुन्हा सुरू झाला.

जीना बंद पडला, तो कसा बरोबर होता याचे समर्थन काहींकडून होऊ शकते…शेवटी ती मशीन आहे.चर्चा बंद पडला ही नसून काल दोन उदघाटने झाल्यानंतर लगेच बंद पडला अशी होण्याची शक्यता अधिक आहे.

दोन दोन उदघाटने न झेपल्याने या जिन्याने अवघ्या काही तासात दम तोडला, असे कदाचित विरोधक म्हणतीलही.आता विरोधकांना काही कामधंदा नाही असा टोला लागलीच सत्ताधारी लगावतील!

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातील…पुन्हा कधीतरी एकाच जिन्यावर येणारा प्रवाशांचा ताण न झेपल्याने किंवा तांत्रिक कारणाने तो पुन्हा बंद पडेल…

प्रश्न येणाऱ्या ताणाचा आहे…दिवा शहराचा लोकसंख्या वाढीचा वेग आणि उपलब्ध होणाऱ्या सोयी सुविधांचा वेग यात कमालीचा फरक आहे.

दिवा रेल्वे स्थानकात नव्या तिकीट खिडकीचे उदघाटन अलीकडे झाले.शिवसेने हे उदघाटन केल्यानंतर मनसेने ही पेढे आणि साखर वाटली.ही तिकीट खिडकी सुरू झाल्यावर आधीच्या तिकीट खिडकीवरील ताण काही प्रमाणात कमी झाला!

मध्यंतरी भाजप आणि सेना, रेल्वे मंत्री दिवा स्थानकात आले असता आमने सामने आले…तसा श्रेयासाठी संघर्ष दिव्यासाठी नवा नाही…त्यामुळे एकाच जिन्याचे दोन उदघाटने झाली यात नवीन असे काही नाही… नवीन जे आहे ते पुढे घडणाऱ्या समस्या आहेत!शहरावर येणारा ताण प्रशासनाने वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

दिव्याला उपलब्ध होणारे पाणी आणि प्रत्यक्षात येथील जनतेची मागणी यात तफावत असल्याने पाणी टंचाई आहे.पाणी समस्येचे हे एक कारण आहे.

दिवा शहराची ड्रेनेज वाहून नेण्याची क्षमता किती आहे…तशी व्यवस्था शहरात उभारली गेली आहे का?सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता या शहरात येत्या काही काळात कोलमडलेली दिसेल…शहराचे नेतृत्व करणाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.त्यासाठीच्या उपाययोजना जलदगतीने होणे गरजे आहे.

तीच अवस्था गटारांची आहे.पुढील काही वर्षे शहरातील नागरिकांना पावसाळ्यात घरात पाणी शिरणार नाही अशी नाल्यांची बांधणी झाली आहे का?नसेल तर असणाऱ्या भरलेल्या नाल्यांवर पावसाळ्यात ताण येणारच…याचा परिणाम दर पावसात लोकांच्या घरात पाणी भरणे या स्वरूपात होणारच!उपाययोजना काय?लोकसंख्या ज्या पद्धतीने दिवा शहरात वाढत आहे,त्या तुलनेत सोयी सुविधा उपलब्ध होण्याचा वेग फार कमी आहे.कासव आणि सशाची शर्यत लावावी तसा हा फरक आहे.

वाढत्या लोकसंख्येचा परिणाम पाणीपुरवठा,आरोग्य सुविधा, कचरा व्यवस्थापन,परिवहन व्यवस्था यासह अन्य सोयीसुविधांवर होताना दिसतो. एक सुंदर शहर होण्यासाठी दिवा शहरातील वाढत्या लोकसंख्येला जलदगतीने सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ज्या गरजा आज आहेत त्या 5 वर्षांनी सुरू केल्या तर त्यावर ताण येणारच आहे.परिणामी दिवा शहराच्या लोकसंख्येचा अभ्यास करून येथील गरजा प्रशासनाने पुरवायला हव्यात!पूर्वेला एक जीना केला…कौतुक आहे,पण हेच जर तिन्ही ब्रीजला एकाच वेळी सरकते जिने लागले तर अधिक चांगले होईल.

आधीच सरकता जीना,वाढीव तिकीट खिडकी या गोष्टी दिवा स्थानकात होण्यास विलंब झालाय…त्यात अजून दिवा स्थानकावर येणारा प्रवाशांचा ताण लक्षात घेऊन स्वतंत्र लोकल सुरू करण्यास विलंब नको…इतकीच काय ती सरकार दरबारी दिवेकर जनतेची विनंती आहे.

error: Content is protected !!