आज दुपारी मातोश्रीवर होणार पक्ष प्रवेश, भाजपने डावळल्याने ज्योती पाटील होत्या नाराज
दिवा:-तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा शहरातील महिलांच्या प्रश्नांवर कायम आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या तसेच दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा म्हणून मागील एक वर्षापासून सक्रिय काम करणाऱ्या ज्योती पाटील यांना पक्षाने पदावरून डावल्यानंतर त्यांनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आज शनिवारी दुपारी बारा वाजता त्यांचा पक्षप्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेत होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे नेते राजन विचारे, लोकसभा संपर्कप्रमुख खोत, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांच्या उपस्थितीत ज्योती पाटील ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार असल्याची माहिती पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
ज्योती पाटील या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.दिवा शहरात पक्ष फुटी नंतर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती, ज्योती पाटील यांच्यासारखा दिग्गज चेहरा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान अंतर्गत राजकारणाला कंटाळून ज्योती पाटील यांनी भाजपला राम राम ठोकल्याची चर्चा दिव्याच्या राजकीय वर्तुळात आहे.
“मी प्रामाणिकपणे दिव्याचे प्रश्न मांडत होते. पक्षाचे काम पूर्ण क्षमतेने करत असतानाही मला बाजूला केलं गेलं. मी दिव्यातील जनतेला बांधील आहे त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडणे माझे काम आहे.अंतर्गत कुरघोड्या, अपमानास्पद वागणूक या सर्वांचा मला अक्षरशः कंटाळा आला होता. तुम्ही काम करून देखील तुम्हाला डावलले जात असेल तर तिथे थांबण्यात अर्थ नाही.दिव्यातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पर्याय मला योग्य वाटतो”-ज्योती राजकांत पाटील