ठाणे: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान विविध घटकातील नागरिकांकडून मिळत असलेला उल्लेखनीय प्रतिसाद पाहूनच केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून या न्याय यात्रेला अडथळे आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास औताडे यांनी मंगळवारी ठाण्यात केला. ठाणे शहरातही भारत जोडो न्याय यात्रा 16 मार्च रोजी पोहोचत असून या यात्रेत सेवादल महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाणे शहर (जिल्हा) सेवादल अध्यक्षपदी रविंद्र कोळी यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या पदग्रहण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास औताडे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिदे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष शेखर पाटील,शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष प्रकाश पेवेकर, प्रदेश महिला सेवादल अध्यक्ष सविता जाधव, ग्रामीण काँग्रेस सेवादल अध्यक्ष प्रकाश भांगरत, प्रदेश काँग्रेस सदस्य सुखदेव घोलप,जे.बी.यादव, प्रदेश सहकार विभाग उपाध्यक्ष शैलेश शिंदे, महिला काँग्रेस अध्यक्ष स्मिता वैती, असंघटीत कामगार अध्यक्ष संदीप शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी सांगितले की रविंद्र कोळी यांच्या सारख्या अनुभवी कार्यकर्त्यांवर सेवादल काँग्रेसची जबाबदारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी आली आहे. याचा प्रत्यय लवकरच आपल्या समोर दिसेल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.