दिवा:-वाढत्या शहरासोबत वाढत्या समस्या या आपल्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. दिवा शहरात राहणारे दिवेकर नागरिक म्हणून कधीतरी समस्यांच्या मुळापर्यंत जाण्याचा आपण विचार करणार आहोत की नाही? हा माझा तमाम दिवेकर जनतेला प्रश्न आहे.
फार छोट्या छोट्या समस्या आपल्याला विक्राळ रूप धारण करून भेडसावत असतात. उदाहरण सांगायचं झालं तर दिवा शहरात रस्त्यावर चालायला फुटपाथ नसणे…इतर शहरांच्या तुलनेत ही कदाचित छोटी समस्या असेल मात्र आपल्या दिवा शहराच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास ही खूप मोठी समस्या आणि विक्राल रूप धारण केलेली आहे. नियोजनाचा बोजवारा उडालेला आहे..!
आधीच दिवा शहरातील रस्ते हे अरुंद आहेत.गरजेपोटी इथे घर बांधली गेल्याने सर्वसामान्यांना या ठिकाणी हक्काचा निवारा मिळाला… मात्र सोयीसुविधांच काय? आधीच अपुरे रस्ते त्यात फुटपाथ देखील चालायला नाहीत ही परिस्थिती बदलायला हवी. नागरिक म्हणून आपण या समस्येचा विचार करणार आहोत की नाही? पाणी समस्या मागील 15 वर्ष दिव्यातील जनतेला भेडसावत आहे. येथील जनता या समस्येला अक्षरशः कंटाळलेली आहे.दिवा शहरातील नागरिकांना पाणी समस्येमुळे आर्थिक संकटांना सामोरे जावं लागतं.
सर्वात महाग पाणी दिवा शहरातील जनतेला विकत घ्यावे लागत असेल. महिन्याला पंधरा-वीस हजार कमावणारा येथील सर्वसामान्य नागरिक, पाण्यापोटी टँकर वर महिन्याकाठी दोन ते तीन हजार रुपये खर्च करतो… किती दुर्दैवाची गोष्ट आहे!
महापालिका प्रशासनाला येथील जनतेचे हाल दिसत नाहीत. प्रशासनाला आपले हाल दिसत नाहीत म्हणून जनतेने गप्प राहून कसं चालेल…दिवेकर नागरिक म्हणून आपण या समस्या विरोधात एक होणार आहोत की नाही? हा माझा प्रश्न आहे. आपली विचारधारा कोणतीही असेल, मात्र भेडसावणारी समस्या सर्वांना एकच आहे. पाणी समस्येमुळे दिवा वासियांचे जीवन हैराण आहे.दिवा शहरातील सर्वसामान्य कुटुंबांना मुबलक स्वरूपात पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.दिवा शहरातील पाणी योजना फसलेली आहे.या विरोधात नागरिक म्हणून आपण जागे होणार आहोत की नाही. आपण प्रशासनाला नागरिक म्हणून जाब विचारणार आहोत की नाही? मिळणाऱ्या अपुऱ्या पाण्यावर आपण समाधानी राहत असो तर भविष्यातील मोठ्या संकटाला आपणच निमंत्रण देत आहोत हे विसरून चालणार नाही. .
शहरात कुठेही फिरा कचऱ्याची समस्या गंभीर असलेली दिसते.स्वच्छ भारत संकल्पना दिव्यात प्रत्यक्षात अस्तित्वात आलेली दिसत नाही.महापालिका प्रशासन नेमकं काय करतं हा आमचा प्रश्न आहे.केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या खूप चांगल्या योजना आहेत. या योजना प्रशासन दिवा शहरात राबवत नाही हा आमचा आक्षेप आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये दिवा शहर बकाल आहे.येथील तलावांमध्ये अस्वच्छतेचे भंडार आहे. तलाव ही विद्रूप झालेली आहेत. ती स्वच्छ झाली पाहिजेत यासाठी आम्ही आंदोलन केली आहे. तलाव ही चांगली व्हावी यासाठी आमची आग्रही भूमिका आहे.मात्र प्रशासनाला हे दिसत नाही. आता प्रशासनालाही दिसत नाही म्हणून दिवेकर नागरिक म्हणून आपण गप्प राहून चालेल काय?दिवेकर नागरिक म्हणून दिव्याच्या स्वच्छतेसाठी आपण आग्रही असणं हे आपलं कर्तव्य आहे. माझी दिव्यातील सर्व तमाम जनतेला दिवेकर नागरिक म्हणून विनंती आहे… आपण जनता म्हणून आपल्या प्रश्नाबाबत सजग असलं पाहिजे.हीच अवस्था आरोग्याच्या बाबतीत आहे, दिवा शहरातील आरोग्यवस्था कोलमडलेली आहे. आपण नागरिक येथील आरोग्य व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या समस्यांना सामोरे जातो,मात्र आवाज उठवताना आपण एकजूट राहत नाही…त्याचा गैर फायदा प्रशासन घेते. आपल्याला सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत,आपण याचा विचार करायला हवा. येणाऱ्या काळामध्ये आरोग्याच्या प्रश्नावर सुद्धा दिवेकर नागरिक म्हणून आपण एकजूट झालं पाहिजे. ही माझी भूमिका आहे. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या मूलभूत गरजा आहेत. रस्ते,गटार याबाबतीत सुद्धा आपण आज ठाणे शहराच्या तुलनेत कुठे आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. एखाद्या बस स्टॉप साठी आपल्याला आंदोलनाची हाक द्यावी लागते हे आपलं अपयश म्हणावं की यश म्हणावं हेच कळत नाही… दिवेकर जनता म्हणून माझी आपणास तमाम जनतेला विनंती आहे… आता तरी जागे व्हा… समस्यांच्या विरोधात एकजूट व्हा…दिवेकर जागा झाला… दिव्यातील जनता जागी… झाली तर येथील समस्या नक्कीच दूर होतील आणि या सर्व समस्यांवर आपण विजय मिळवू हा विश्वास मला आहे धन्यवाद!
– विजय भोईर
(लेखक ठाणे भाजपचे सचिव आहेत..)