दिवा: दिव्यातील बेडेकर नगर परिसरात एका परप्रांतीय फेरीवाल्याने एका मराठी माणसावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पालिका प्रशासनाकडे दिव्यातील रहदारी आणि वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या मुजोर फेरीवाल्यांना तातडीने हटवण्याची मागणी केली आहे.
बेडेकर नगर येथे झालेल्या या हल्ल्यात उतेकर नावाचे मराठी माणूस जखमी झाले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ज्योती पाटील यांनी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. “दिव्यात मराठी माणसांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिव्यातील रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. “दिव्यातील अनेक रस्ते फेरीवाल्यांमुळे अरुंद झाले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दिव्यातील रस्ते मोकळे करावेत,” अशी मागणी त्यांनी केली.
या घटनेमुळे दिव्यातील फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांकडून फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आता पालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.