मनसेच्या तक्रारीनंतर शाळा नरमली
ठाणे :- श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया शाळेच्या लगत चालू असलेल्या बांधकामामुळे ४५ हून जास्त विद्यार्थी व ५ शिक्षक डेंग्यू, मलेरिया ने आजारी आहेत तसेच ११० हून जास्त जणांना ताप आलेला आहे. काहींची तब्येत जास्त खराब झाली आहे.
जोपर्यंत योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत तोपर्यंत शाळेत मुलांना बोलवू नये असे आदेश द्यावेत अशी मागणी मनविसेचे संदीप पाचंगे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे १६ जून रोजी केली होती. प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालकांसोबत चर्चा करून व त्यांच्या सूचनेनुसार, नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सर्व वर्गांसाठी १८ जून ते २८ जून २०२५ या कालावधीत शिक्षण पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय शाळेने घेतला आहे.
या शाळेच्या आवारात एका नव्या इमारतीचे काम सुरू आहे. या बांधकामामुळे शाळेत डासांचा प्रादूर्भाव वाढला असून याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत शाळा प्रशासनाकडून काही वर्ग भरवले जात होते. शाळेजवळ सुरू असलेल्या बांधकामामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्यामुळे डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव झाल्याचे पालकांच्या तक्रारी आल्या होत्या असे पाचंगे यांनी सांगितले.
दरम्यान शाळा प्रशासनाने अगदी लहान वयाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात अडचणी येऊ शकतात, हे लक्षात घेता नर्सरी, ज्युनिअर केजी व सीनिअर केजीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ऑनलाईन वर्गात सहभागी न होता त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी युनिट टेस्ट सध्या पुढे ढकलण्यात आली असून, आता ती ३० जूनपासून घेण्यात येईल. नव्याने सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. इयत्ता पाचवीची युनिट टेस्ट सध्या रद्द करण्यात आली आहे. ३० जून २०२५ पासून सर्व विद्यार्थ्यांचा नियमित वर्गशिक्षण पुन्हा सुरू होणार असून, सर्व वर्ग जुन्या इमारतीत भरवले जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व तयारी शाळा प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे शाळा प्रशासनाने पालकांना पत्राद्वारे कळविले आहे.
मनसेने या प्रश्नाबाबत आवाज उठवित शिक्षणाधिकाऱ्यांना कारवाई करण्यास भाग पाडले तर शाळा प्रशासनाने नमते घेत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे पाचंगे यांनी सांगितले.