झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामाला मिळेल गती
ठाणे : गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे विभागाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद रिक्त होते. त्या रिक्त पदी पराग सुरेश सोमण यांची वर्णी लागल्याने अखेर ठाणे एसआरए विभागाला त्यांच्या रूपाने आयएएस अधिकारी मिळाला आहे. (पराग सोमण हे निवड श्रेणी अप्पर जिल्हाधिकारी मधून आयएएस अधिकारी झाले आहेत.) एसआरए ठाणे ला मिळालेले पराग सोमण हे बहुदा पहिलेच आयएसए अधिकारी ठरले आहेत.
यामुळे जिल्ह्यातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामाला निश्चित गती मिळणार आहे. सोमण हे औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त म्हणून कार्यरत होते. ते अप्पर जिल्हाधिकारी निवड श्रेणीत आयएएस झाले आहेत.ठाण्याच्या एसआरए विभागाला आयएसए अधिकारी मिळावा अशी मागणी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी लावून धरली होती. तसेच आमदार केळकर यांनी याबाबत अधिवेशनात आवाज ही उठवला होता. त्याच ठाणे विभागात रिक्त असलेल्या जागेमुळे एसआरएच्या कामांना विलंब होत होता. त्या विलंबला आता पूर्ण विराम मिळाला आहे. नुकतीच सोमण यांची ठाणे विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्णी लागली असून त्यांनी या पदाचा पदभारही स्वीकारला आहे. सोमण यांनी यापूर्वी पुणे , सातारा, सांगली आणि सोलापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून पद भूषवले आहे. तर अप्पर जिल्हाधिकारी (संवर्ग) म्हणून नागपूर विभाग उपायुक्त ( करमणूक) , तसेच उस्मानाबाद येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कामाची समर्थ्यपणे जबाबदारी बजावली आहे. तसेच अप्पर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) महसूल उपायुक्त कार्यरत होते. सोमण यांची आता पर्यंत २५ वर्ष १ महिने शासकीय सेवा पूर्ण झाली आहे. आता ते मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे विभागाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाले आहेत. या परिसरातील आठ महानगरपालिका,आठ नगरपालिका आणि एक ग्रामपंचायत इतका कार्यक्षेत्राचे ते प्रमुख असणार आहेत. त्यामुळे या विभागाच्या कामांना गती मिळेल असे बोलले जाऊ लागले आहे.