Homeठाणे-मेट्रोकोपरी स्मशानभूमीत प्राणी दहनवाहिनी! कोपरीतील रहिवाशांचे आंदोलन

कोपरी स्मशानभूमीत प्राणी दहनवाहिनी! कोपरीतील रहिवाशांचे आंदोलन

ठाणे :- कोपरीतील कन्हैय्यानगर-ठाणेकरवाडी स्मशानभूमीत पशू, पक्षी आणि प्राण्यांसाठी दहनवाहिनी उभारण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे सचिव ओमकार चव्हाण यांच्यासह रहिवाशांनी आंदोलन करून मुंबई महापालिकेच्या धर्तीवर अन्य ठिकाणच्या राखीव भूखंडावर प्राणी दहनवाहिनी उभारावी, अशी आग्रही मागणी केली आहे. अन्यथा, आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने कोपरी येथील स्मशानभूमीच्या विकासासाठी साडेबारा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. मात्र, २०१७ पासून स्मशानभूमीचे काम संथ गतीने सुरू आहे. स्मशानभूमीतील गैरसोयींबद्दल कोपरीतील रहिवाशांमध्ये नाराजी असतानाच, या स्मशानभूमीतच प्राण्यांसाठी दहनवाहिनी उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. या संदर्भातील माहिती भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळविली. त्यानंतर आज स्मशानभूमीबाहेर आंदोलन करण्यात आले.

कोपरीतील रहिवाशांसह कोणाचाही प्राण्यांच्या दहनवाहिनीला विरोध नाही. परंतु, मानवासाठीच्या स्मशानभूमीतच पशू, पक्षी आणि प्राण्यांचे दहन करण्याचा निर्णय हा नागरिकांच्या भावनांशी खेळणारा आहे. या प्रस्तावातून टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन व ठेकेदाराकडून केला जात आहे, असा आरोप भरत चव्हाण यांनी केला. गेल्या ८-९ वर्षांपासून स्मशानभूमीचे काम संथगतीने सुरू आहे. या कामाच्या ठेकेदाराला अधिकाऱ्यांकडून पाठीशी घातले जात असून, मूळ स्मशानभूमीऐवजी नवी कामे काढली जात आहेत. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची आवश्यकता आहे. तर येत्या सहा महिन्यांत काम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच कोणत्याही परिस्थितीत या स्मशानभूमीतच प्राण्यांची दहनवाहिनी उभारण्यास विरोध राहील, असा इशारा भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी दिला.

error: Content is protected !!