मानपाड्यातील घरांवरील मोजणी क्रमांकांवर फासला पांढरा रंग
ठाणे :- मानपाडा , आझादनगर, मनोरमा नगर येथील प्रस्तावित क्लस्टर डेव्हलपमेंटला स्थानिकांकडून प्रचंड विरोध होऊ लागला आहे. येथील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रणशिंग फुंकले असून आपल्या घरांवर टाकलेले नोंदणी क्रमांक पांढर्या रंगाने पुसण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, जनमताचा आदर करणे लोकशाहीत अभिप्रेत असतानाही लोकांचा विरोध असतानाही कशासाठी क्लस्टरचा हट्ट धरत आहात, असा सवाल डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
मानपाडा, मनोरमा नगर, आझादनगर आदी परिसरात ठाणे महानगर पालिकेकडून क्लस्टर डेव्हलपमेंट (समूह विकास) योजना राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही ही योजना राबविण्यात येत असून जानेवारी महिन्यात येथील शाळांवर हातोडा चालविण्यात आला होता. प्रशासनाकडे विरोध नोंदवूनही क्लस्टरसाठी जबरदस्ती केली जात असल्याने डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी आज मानपाड्याला भेट दिली. या प्रसंगी हजारो रहिवाशी उपस्थित होते. “आमची घरे वाचविण्यासाठी आम्हाला साह्य करा”, अशी विनंती स्थानिकांनी डाॅ. आव्हाड यांना केली. त्यावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी गोरगरिबांच्या लढ्यात आपण नेहमीच पुढे असतो, असे सांगितले.
डाॅ. आव्हाड म्हणाले, ठाणे महानगर पालिकेचे काम जनतेला नागरी सुविधा पुरवण्याचे आहे. पण, इथे बिल्डर्सची धनसंपत्ती वाढविण्यातच ठामपा अधिकाऱ्यांना अधिक स्वारस्य आहे. जानेवारी महिन्यात जर शाळा तोडल्या जात असतील तर पैशापुढे माणुसकी हरत असल्याचेच दिसत आहे. तुम्ही मत देताना विचार केला नाही. ज्यांना मत देऊन विजयी केले तेच आता तुमच्या डोक्यावरचे छतच हटवत नाहीत तर तुमच्या नरडीवर पाय देत आहेत. आपल्याकडे रस्ता नाही , पाणी नाही. यावर आपण प्रश्न विचारत नाही. पण, अधिकाऱ्यांसमोर आपण शरणागती पत्करतोय. आता शरणागती पत्करायची नाही. उन्हा-पावसात मी तुमच्यासाठी लढायला सज्ज आहे. पण, तुम्ही देखील लढायला हवे ना! जर प्रत्येक घरातून फक्त एक माणूस रस्त्यावर उतरला ना तर कुणाच्या बापाची हिमंत नाही आपल्याला घराबाहेर काढायची.
प्रशासनाला इशारा देताना ते म्हणाले , गोरगरिबांच्या रागाची परीक्षा घेऊ नका. आता ही जबरदस्ती सहन केली जाणार नाही. घरावर आलात तर शिंगावर घेऊन भिरकावून देऊ. क्लस्टर योजनाच बिल्डरधार्जिणी आहे. ती आम्ही उधळून लावणारच आहोत. पण, मानपाड्यात पडलेली ही ठिणगी आता शहरभर पसरणार आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण तत्काळ बंद करा.
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, रचना वैद्य, एकनाथ जाधव आदी उपस्थित होते.
नोंदणी क्रमांक पुसले
रहिवाशांना संबोधताना डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी घरावर टाकलेले क्रमांक पुसून टाकण्याचे आवाहन केले. यावेळी डाॅ. आव्हाड यांनीच पुढाकार घेऊन घरांवर लिहिलेले क्रमांक पांढर्या रंगाने पुसून टाकले. त्यानंतर अनेक रहिवाशांनी आपल्या घरावरील क्रमांक पुसले.