ठाणे स्थानकात कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाद्वारे रांगेचे शिस्तबद्ध नियोजन
ठाणे: कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाकरमानी आपल्या गावाकडे निघाले आहेत. कोकण रेल्वेने गावी जाण्यासाठी मुंबई, ठाण्यात हजारोंच्या संख्येने प्रवाश्यांची अक्षरशः झुंबड उडत आहे.ठाणे रेल्वे स्थानकात तर कोकणात गावी जाणाऱ्यासाठी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाच्यावतीने मेंगलोर एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस आणि तुतारी या गाड्यांसाठी प्रवाशांच्या रांगा लावून दररोज उत्तम नियोजन केले जात असल्याने चाकरमान्यांना उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे.
गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील मोठा सण असुन जणु वार्षिक महोत्सवच असतो. या काळात चाकरमानी आपापल्या मुळ गावी कुटुंब काबिल्यासह मिळेल त्या वाहनाने तसेच रेल्वेने जात आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोकणवासिय आपल्या गावच्या विविध सण-उत्सवांना मुकले होते. आता कोरोना प्रादूर्भाव घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या असुन कोविड प्रतिबंध नसल्याने गावी जाण्यासाठी ठाणे स्थानकात चाकरमान्यांची अक्षरशः झुंबड उडत आहे. कोकणात मार्गस्थ होणाऱ्या मेंगलोर एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेस या गाड्यांसाठी ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर गेले काही दिवस गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची भाऊगर्दी वाढली आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या जनरल (सर्वसाधारण बैठक) अनारक्षित बोगीतुन प्रवास करण्याची मुभा असल्याने दोन दिवस आधीच स्टेशनवर रांगा लावल्या जातात. याचे सर्व नियोजन कोकण रेल्वे प्रवाशी संघाचे कार्यकर्ते गेली अनेक वर्षे स्वेच्छेने विनामोबदला करीत आहेत. राजकिय अभिनिवेष बाजुला ठेवुन कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाचे प्रमुख मार्गदर्शक राजु कांबळे, अध्यक्ष सुजित लोंढे, माजी अध्यक्ष संतोष पवार, खजिनदार संभाजी ताम्हणकर,दर्शन शेटये,आचरेकर, सुनिल गुरव आदींसह अनेक पदाधिकारी नियमितपणे हे काम करीत असल्याने एकप्रकारे रेल्वे प्रशासनालाही सुव्यवस्था राखण्यात संघटनेचा हातभार लागत आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
३१ आँगस्टला गणेशोत्सव असल्याने गेले काही दिवस ठाणे स्थानकात कोकण रेल्वेने गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची झुंबड उडत आहे. यासाठी, कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाच्या माध्यमातुन दोन दिवस आधीच रांगेची यादी तयार केली जाते. यात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार प्रवाश्याचे नाव व सहप्रवाश्यांची संख्या यादीमध्ये नोंदवली जाते. त्यानुसार, प्रवासाच्या दिवशी प्रत्यक्ष रांग लावुन सर्वाना शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत ठाणे बोगीमध्ये प्रवेश दिला जातो.
– सुजित लोंढे, अध्यक्ष कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघ






