ठाणे बाजारपेठेतून श्रीगणेशा
ठाणे : ठाणे महापालिका प्रशासनाने आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना राबविण्याबरोबर त्या योजनेला मुदतवाढही दिली होती. तरी सुद्धा अद्यापही थकबाकीदारांची संख्या कमी होत नसल्याने त्या झोपी गेलेल्या थकबाकीदारांना जागे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनोख्या पद्धतीने अवलंब केला आहे. थकबाकीदारांच्या आस्थापनांच्या ठिकाणी जाऊन ढोल ताशाचा जोरजोरात गजर करण्यास गुरुवारपासूनच सुरुवात केली आहे. या गजराचा ठाणे बाजारपेठेतून महापालिका प्रशासनाने श्रीगणेशा केला आहे.
मालमत्ता कर विभागाला उद्दीष्ट गाठण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. तसेच हे उद्दीष्ट गाठण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणी प्रभाग समितीनिहाय उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी करण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी दुपार नंतर अचानक ठाण्यातील जांभळीनाका परिसरातील बाजारपेठेत अनेकांच्या दुकानांसमोर ढोल ताशाचा गजर सुरू झाला. हा गजर कानावर पडल्याने नागरिकांना नेमके काय झाले हे समजत नव्हते. लग्नाची वरात आली की भारत मॅच जिंकला किंवा नक्की काय कार्यक्रम याची विचारपुस सुरू झाली होती. दरम्यान हा गजर केवळ मालमत्ता कराची थकबाकी त्या त्या आस्थापनांनी भरावी यासाठीच केला जात असल्याचे स्पष्ट झाले.
गुरुवारी नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या माध्यमातून उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे बाजारपेठेत असलेल्या विविध आस्थापनांच्या ठिकाणी अशा पध्दतीने ढोलताशा वाजवून त्यांनी मालमत्ता कराचा भरणा करावा असे आवाहन करण्यात आल्याचे चित्र पाहण्यास मिळून आले आहे.
” यापूर्वी या थकबाकीदारांना पत्राद्वारे, भेटून, नोटीसीद्वारे कळविण्यात आले होते. मात्र त्यानंतरही या आस्थापनांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे त्यांना ढोलताशा वाजवून मालमत्ता कराचा भरणा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.”- शंकर पाटोळे – उपायुक्त, ठामपा