ठाणे: आचार संहिता लागू झाल्यावर अवघ्या तीन दिवसातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पी. वेलरासु यांच्या जागी बदली झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का बसला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभाग, अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्या पत्रात आपण आपल्या सध्याचा पदाचा कार्यभार प्रधान सचिव (२) नगर विकास विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार यांच्याकडून त्वरित स्वीकारावा असेही नमूद करण्यात आले आहे.
नवीमुंबई नंतर आयुक्त बांगर यांनी ठाण्यातही आपली छाप निर्माण केली. तसेच मुख्यमंत्र्यांचे बदलतंय ठाणे हा उपक्रम त्यांनी राबवताना विशेष काळजी घेतल्याचे पाहण्यास मिळाले. त्याचबरोबर ते महापालिका आयुक्त पदी विराजमान झाल्यावर दायित्व असलेले डोंगर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्यांना यश ही आले. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ठाणे महापालिका आयुक्त बांगर यांच्या बदलीबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अचानकपणे त्यांच्या बदलीचे वारे विरुध्द दिशेने वाहू लागले. त्यांच्यानंतर आयुक्तांनी महापालिका अर्थसंकल्प सादर करत तो मंजूर केला. त्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री शिंदे यांची छाप असल्याचे पाहण्यास मिळाले. त्यातच त्यांनी 50 टक्के महिलांना ठामपा परिवहन सेवेतून प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात ही आणला. त्यांच्या कामाच्या धडाक्याने ठाणेकर नागरिकांकडून त्यांच्याकडील अपेक्षा निश्चित वाढल्या होत्या. मात्र आज अचानक आयुक्तांची बदली बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त झाल्याने आता ठामपा नवे आयुक्त कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.