■ सुहास खंडागळे
दिवा:- दिवा शहराचा होणारा विस्तार लक्षात घेऊन आणि दिवा पश्चिमेला मोठ्या प्रमाणात वाढलेली वस्ती याचा विचार करून रेतीबंदर ते दिवा पश्चिम असा कोस्टल रोड तयार करून तो डोंबिवलीला जोडण्यात यावा अशी महत्त्वाची मागणी माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी केली आहे.
रेतीबंदर ते दिवा पश्चिम येथून डोंबिवलीच्या दिशेने जाणारा कोस्टल रोड झाल्यास या खाडी भागाचा विकास होण्यास मोठा हातभार लागेल.या दृष्टीने विचार करून संबंधित रस्ता मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे माजी नगरसेवक व शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांनी सांगितले.दिवा पश्चिमेला मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. त्याचबरोबर दिवा शहराची कनेक्टिव्हिटी ठाणे शहराशी जलद गतीने जोडण्यासाठी, त्याचबरोबर दिवा-डोंबिवली- ठाणे ही महत्त्वाची शहर जोडण्यासाठी हा कोस्टल रोड अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल असे शैलेश पाटील यांनी म्हटले आहे. ठाणे डोंबिवली कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक कोंडीवर देखील या कोस्टल रोडच्या माध्यमातून मार्ग निघेल असेही शैलेश पाटील यांनी म्हटले आहे.या संदर्भात लवकरच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन हा रस्ता होण्याबाबतचे महत्त्व सांगणार असल्याचे शैलेश पाटील यांनी म्हटले आहे.