भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे उद्गार, प्रताप सरनाईक, सोमय्या यांचीही भेट
ठाणे :- ठाण्यात भरविण्यात आलेली मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत मानाचे पान ठरेल, असे उद्गार भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल येथे व्यक्त केले. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही काल स्पर्धेला भेट दिली.
ठाण्यात बुधवारपासून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने मानाची ७२ वी पुरुष श्री कृष्ण करंडक व महिला गटासाठी स्व. पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा-२०२५ ठाण्यात सुरू झाली आहे. ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील जे. के. केमिकल कंपनीच्या आवारात स्व. अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीत मातीच्या सहा क्रीडांगणांवर कबड्डीचा थरार सुरू आहे.
या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी काल
सायंकाळी स्पर्धेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. राज्य व जिल्हा स्तरावरील कबड्डी
असोसिएशनचे पदाधिकारी, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले व माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी उत्कृष्ट पद्धतीने स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे शहरातील होतकरू कबड्डी खेळाडूंना राज्यातील अव्वल खेळाडूंचा खेळ पाहता आला, ही आनंदाची बाब आहे, असे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
तत्पूर्वी आमदार रवींद्र चव्हाण यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या समवेत एका कबड्डी सामन्यात नाणेफेक केली. तसेच खेळाडूंना हस्तांदोलन करीत शुभेच्छा दिल्या.
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.