दिवा:-शहरातील सिद्धिविनायक गेट येथे रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून रस्त्याच्या कामाचे नियोजन न करता नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन संबंधित ठेकेदार अधिकारी यांनी तोडल्याने शहरातील मुंब्रा देवी कॉलनी परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे ट्विट दिवा भाजपच्या महिला मंडळ अध्यक्षा सौ ज्योती पाटील यांनी पालिका आयुक्तांना केले आहे.
सिद्धिविनायक गेट येथे रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागाने याभागातून ज्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन जातात तेथील नागरिकांसाठी पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्था करायला हवी होती,मात्र असे न केल्याने मुंब्रा देवी कॉलनी, दत्त नगर भागातील हजारो नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत असल्याचे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे.संबंधित विभागाला यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सूचना देण्यात याव्यात अशी मागणी ज्योती पाटील यांनी केली आहे.






