मुंबई:ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत उघड्या मॅनहोलमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेच्या कारभारावर आणि अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेवर अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
या दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला ६ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने आधीच दिले होते. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. उघड्या मॅनहोलमुळे झालेल्या मृत्यूबद्दल कुटुंबाला ६ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देऊनही अद्याप त्याची पूर्तता का झाली नाही, अशी विचारणा न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी केली होती. तसेच ठाणे पालिका आयुक्त अशा कोणत्या कामात व्यग्र आहेत, असा जाबही विचारला होता.
त्या पार्श्वभूमीवर झालेल्या सुनावणीदरम्यान, ठाणे महापालिकेच्या वतीने वकील मंदार लिमये यांनी न्यायालयाला माहिती दिली की, ७५ हजार रुपये भरपाई देण्याचा निर्णय एका तज्ज्ञांच्या समितीने घेतला होता. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. “महापालिका आणि समितीतील अधिकारी एवढे असंवेदनशील, निर्लज्ज कसे?” अशा कडक शब्दांत न्यायालयाने पालिकेच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.






